
महागार्ईलाच आले ‘अच्छे दिन’!
पुणे, ता. ११ ः बांधकाम करणारे अनेक मजूर एका वडापावावर दिवस काढणारे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून १५ रुपयांनाच वडापावची विक्री करतो. वाढत्या महागार्ई सोबत त्यात लगेचच वाढ करता येत नाही, केली तर ग्राहक तुटण्याची शक्यता असते. तेलाचे, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, हे समजत नाही. सरकारने किमान काही झाले, तरी सर्वसामान्याला त्रास होणार नाही, असे निर्णय घ्यावेत, अशी भावना वडापाव विक्रते मोहन भिसे यांनी व्यक्त केली.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस सिलिंडर यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे इतर वस्तूंचे देखील दर वाढत आहेत. सर्वसामान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खाद्य पदार्थ विक्री करणारे, भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते या छोट्या व्यावसायिकांची तर चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. यांच्यासह मिळणाऱ्या उत्पन्नात घर खर्च कसा भागवावा? असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. महागार्इबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याबाबत वाचकांनी व्यक्त केलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.
गॅस सिलिंडरचे भाव वाढायला लागले, तर सर्व सामान्य लोकांनी काय करायचे? खासगी नोकरीमध्ये पगारवाढ लगेच होत नाही. गॅस सिलिंडरसाठी महिन्याकाठी १००३ रुपये आणणार कोठून?, हा मोठा प्रश्न आहे. याला जबाबदार कोणती व्यक्ती आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. सबसिडी तर गायबच झाली आहे.
- मीनाक्षी चांदेकर, कात्रज
घरगुती गॅस दरवाढीमुळे काटकसर म्हणून दोन वेळच्या स्वयंपाकाऐवजी आता एकच वेळा जेवण तयार केल्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. केंद्र सरकारने चैनीच्या वस्ततुंवर दरवाढ करून जीवनावश्यक गॅस इंधनाचे दर नियंत्रित राखले, तर पैशाची बचत होऊ शकते. या दरवाढीवर त्वरित उपाय योजना आखून भाववाढ नियंत्रित करावी.
- गिता भागवत, नारायणगाव, ता. जुन्नर
मध्यम वर्गीय गृहिणींना मानसिक ताण जाणवतो आहे. कारण पेट्रोल, खाद्य तेलाचे भाव वाढले असून त्यात आता सिलिंडरच्या दराची भर पडली आहे. कसे घर चालवावे, ही झळ कशी सोसावी ?
- माधुरी गायकवाड, शिंदे वस्ती रावेत
कोरोनानंतर महागाईमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. बचत न होता जास्त खर्च होत आहे. त्यातच भर म्हणून की काय महागाईच्या आगीत तेल ओतून सिलिंडरची किंमत दोन वर्षांत चार आकडी करून ठेवली आहे. महागाईमुळे महिन्याचे बजेट करताच येत नाही. सरकारने आश्वासने न देता यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. पोकळ आश्वासने देण्यापेक्षा जनतेला सुखाने जगता येईल असे पाहावे, नाहीतर नाइलाजाने म्हणावे लागेल हेच का, ते ‘अच्छे दिन.’
- माधव ताटके
महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. कोणताही राजकीय पक्ष यावर भाष्य करताना दिसत नाही. राजकारण वैयक्तीक हेवेदावे सोडून जनसामान्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्न सोडवण्यास कोणत्याही राजकीय नेत्याला सवड मिळताना दिसत नाही. महागाईमुळे उत्पन्नाचा मेळ बसवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
- किरण लोंढे, कोथरूड
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62386 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..