
वीज थकबाकीदारांसाठी ‘अभय’!
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वर्गवारीतील ५ लाख ६० हजार ८२५ अकृषिक ग्राहकांना ‘विलासराव देशमुख अभय योजने’मधून पुनर्वीजजोडणीची संधी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ग्राहकांनी ७४७ कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना १५५ कोटी ९२ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत या योजनेची मुदत आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषिक ग्राहकांसाठी थकबाकीमुक्तीसह वीजजोडणी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केली आहे.
योजना दृष्टिक्षेपात
- योजनेत सहभागी होऊन मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार आहे
- मूळ थकबाकी भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय असून त्यासाठी ३० टक्के थकबाकीचा भरणा करून योजनेत सहभाग घेणे आवश्यक आहे
- हप्त्यांनी मूळ थकबाकी भरीत असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू केल्यानंतर चालू बिलाच्या रकमेसोबत हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य
- ग्राहकांनी उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली नाही तर माफ केलेल्या व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होणार
आतापर्यंत सहभागी संख्या
पुणे ः ८१७
सातारा- १२०
सोलापूर- १६६
कोल्हापूर- ९९
सांगली १०४
जिल्हावार असे आहे गणित
१) पुणे ः लघु व उच्चदाब वर्गवारीतील २ लाख ९१ हजार ७०४ ग्राहकांनी मूळ थकबाकीच्या ४९४ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे ८५ कोटी ४५ लाख रुपयांची माफी मिळेल
२) सातारा ः ४७ हजार ५०८ ग्राहकांनी ३७ कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे ५ कोटी ३७ लाख रुपयांची माफी मिळेल
३) सोलापूर ः १ लाख ३९ हजार ८६१ ग्राहकांनी ९४ कोटी रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे १८ कोटी ६९ लाख रुपयांची माफी मिळेल
४) कोल्हापूर ः ३५ हजार ७०३ ग्राहकांनी ६३ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केल्यास २१ कोटी ३६ लाख रुपयांची माफी मिळेल
५) सांगली ः ४६ हजार ४९ ग्राहकांनी ५७ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे २५ कोटी ६१ लाख रुपयांची माफी मिळेल
कोणाला योजनेचा लाभ घेता येईल?
- महावितरणने थकीत रकमेच्या वसूलीसाठी कोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना वरील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रियाचा खर्च) देणे अत्यावश्यक आहे
- ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजजोडणी सध्या आहे त्याच ठिकाणी वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल
- संबंधित ग्राहकांना नियमाप्रमाणे नवीन वीजजोडणी घ्यावी लागेल किंवा पुनर्विजजोडणी शुल्क भरावे लागेल
- थकीत वीजबिलासंबंधी न्यायालयाने महावितरणच्या बाजूने आदेश दिलेला असेल तसेच त्यास १२ वर्षांच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने अपील फाईल केले नसेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल
- ही योजना फ्रेंचायझीमधील ग्राहकांनासुद्धा लागू आहे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63233 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..