
‘लवकर’पेक्षा सुरक्षित पोहचण्याचा विचार करा
पुणे, ता. ४ ः पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार होणारे अपघात, वाहतूक कोंडी यावर दैनिक सकाळने बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना अनेकजण लवकर पोहोचण्याच्या नादात वेगमर्यादेचे उल्लंघन करतात, परिणामी अपघात घडतात. यापार्श्वभुमीवर वाहनचालकांनी लवकर पोहचण्यापेक्षा सुरक्षित पोहचण्याचा विचार करावा, असे मतही वाचकांनी नोंदविले.
प्रवासादरम्यान लेन कटिंग सर्रास होते. तसेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी जड वाहने ओव्हरलोड असतात. घाटात अशा वाहनांची गती कमी होते. त्यावेळी मागे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरवात होते. तसेच ही वाहने अनेकदा लेन कटिंग करतात. त्यामुळे देखील वाहतुकीत अडचणी येत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. यातील काही निवडक प्रतिक्रिया.
ट्रक, कंटेनर चालक, ट्रेलर हे बिनधास्त ओव्हरटेक लेन (पहिली लेन) मधून चालत असतात तसेच काही कार चालक सुद्धा पहिल्या लेन मध्ये निर्धारित वेगापेक्षा कमी वेगाने चालतात. त्यामुळे मागून वेगात येणारे वाहनाला लेन कटिंग करावी लागते. त्यातून अपघात घडण्याची शक्यता वाढते. माझ्या मते कार चालकांनी शक्यतो मधल्या लेनमधून गाडी चालवावी व गरज असेल तरच पहिल्या लेनमधून ओव्हरटेक करावे. त्यामुळे पहिली लेन मोकळी राहून मागून येणाऱ्या वाहनांना सुद्धा रस्ता मोकळा राहील. निदान लेन कटिंगचे नियम पाळले तरी अपघाताचे प्रमाण खूप कमी होईल.
- प्रमोद जगताप
मी अनेक वेळा द्रुतगती मार्गावर प्रवास केला आहे. अनेकदा या मार्गावर ठरवून दिलेल्या वेगापेक्षा अधिक गतीने वाहने धावतात. वेग मर्यादा ही रस्त्याची घडण, उतार व वळण ह्या सर्वाचे विचार करून ठरविलेली आहे. त्यानुसार जर वाहने धावली तर अपघाताचे प्रमाण कमी होईल.
- अशोक गोळे
द्रुतगती मार्गावर वाहनांची वेगमर्यादा, लेनची शिस्त, ट्रकमधील वजन या गोष्टी चालकांनी पाळणे अत्यावश्यक आहेत. याच्या अभावामुळे अपघात घडतात. त्याचप्रमाणे आपत्कालीन यंत्रणा चोवीस तास सुसज्ज ठेवणे. टोलनाक्यावर कमीतकमी वेळात टोल संकलन होणे गरजेचे आहे. आपण लवकर कसे पोहचू , यापेक्षा सुरक्षीत कसे पोचू हा विचार महत्त्वाचा आहे .
- प्रकाश मेढेकर
जड वाहनांवर तसेच वेग मर्यादा न पाळणाऱ्या कार चालकांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच काही ठिकाणी धोकादायक उतार व वळणे आहेत त्यात सुधारणा झाली पाहिजे. तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे.
-विजय आकुर्डेकर
सध्या फक्त स्पीड लिमिट तोडल्यास दंडाची कारवाई होते. पण लेन तोडल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही.अपघात फक्त वेगाने वाहन चालवून होत नाही तर लेन तोडल्यामुळे देखील होतो. या बाबतच्या नियमांची माहिती चालकांपर्यंत पोहोचविणे व कारवाई अधिक कडक करणे गरजेचे आहे. ट्रक चालक गाडी न्यूट्रलमध्ये ठेवून ट्रकचे इंजिन बंद करून डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ब्रेक न लागल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे.
-डॉ. राजेश मेहता
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02794 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..