
जनहिताचे काम करणाऱ्यांना संधी मिळावी
पुणे, ता. १४ : ‘‘शेतकरी वाचला तर देश वाचेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे. मतदारांनी जागरूकपणे शेतकऱ्यांसाठी, जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या लोकांना प्रतिनिधित्वाची संधी द्यायला हवी,’’ असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
सोनिया गांधी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहानिमित्त महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. प्रसंगी डॉ. मुळीक यांच्यासह त्यांच्या पत्नी शालिनीदेवी, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे आदी उपस्थित होते. डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या १८ वर्षांपासून मोहन जोशी अतिशय विधायक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सेवा, कर्तव्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा हा सप्ताह आहे.’’
सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम!
जोशी म्हणाले, ‘‘या सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम घेतले जात आहेत. पुष्कर आबनावे यांच्या पुढाकारातून एकाचवेळी या चार उपक्रमांचे आयोजन उल्लेखनीय बाब आहे. ३० मुलींना सुकन्या समृद्धीचे खाते उघडून देण्यासह त्यांचा पहिला हप्ताही आबनावे यांनी भरला आहे. १०० श्वानांचे लसीकरण करत प्राण्यांच्या आरोग्यालाही प्राधान्य दिले आहे.’’ रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांनीही मनोगत व्यक्त करीत या उपक्रमांचे कौतुक केले. पुष्कर आबनावे यांनी प्रास्ताविक केले. प्रथमेश आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. भरत सुराणा यांनी आभार मानले.