
वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून करावी ः वरपे
पुणे, ता. ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग १ आणि २ साठी मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ २०२३ पासून करण्याचे ठरवले आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२५ पासून करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘‘राज्यसेवेची तयारी विद्यार्थी ४ ते ५ वर्षापासून करत असतात. या निर्णयामुळे इतक्या परिश्रमानंतर अचानक एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना थेट युपीएससीच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. या बदलामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. निश्चितच परीक्षा पद्धतीतील बदल ही काळाची गरज आहे. पण जुन्या पद्धतीप्रमाणे परीक्षा तयारीसाठी आयोगाकडून वेळ हवा आहे,’’ असे वरपे यांनी म्हटले आहे.