
राज्यात सव्वादोन लाख विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी
पुणे, ता. ३० : व्यवसायाभिमुख शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील जवळपास ९७२ शासकीय आणि खासगी आयटीआयमधील एक लाख ४९ हजार २६८ जागांकरिता आतापर्यंत दोन लाख २३ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. आयटीआयसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत राज्यातील दोन लाख २३ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे विशेष करून शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात ‘आयटीआय’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. एकीकडे आयटीआयमध्ये विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कंपन्यांना मिळतो, तर दुसरीकडे शिक्षण घेत असतानाच किंवा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हमखास रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करतात.
‘आयटीआय’ प्रवेशासाठी आलेले अर्ज
२,२३,४०३
नोंदणी केलेले विद्यार्थी
२,०४,२१८
अर्ज पूर्ण केलेले विद्यार्थी
२,०१,६२१
शुल्क भरलेले
प्रवेशासाठी उपलब्ध जागा
विभाग : आयटीआयची संख्या : प्रवेशासाठी उपलब्ध जागा
अमरावती : ९० : १८,४८८
औरंगाबाद : १३३ : २०,६३६
मुंबई : १०७ : २०,३७२
नागपूर : २३७ : २८,१७६
नाशिक : २१४ : २९,७५६
पुणे : १९१ : ३१,८४०
एकूण : ९७२ : १,४९,२६८
राज्यातील ‘आयटीआय’ची संख्या आणि प्रवेश क्षमता
तपशील : ‘आयटीआय’ची संख्या : प्रवेश क्षमता
शासकीय आयटीआय : ४१९ : ९३,९०४
खासगी आयटीआय : ५५३ : ५५,३६४
आयटीआयमधील शिक्षण पद्धतीत व्यवसायाभिमुख दिले जाणारे शिक्षण, शिक्षण घेताना आणि घेतल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी अनेक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे येण्याचा कल वाढत आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रशिक्षित केले जाते. त्यामुळे संबंधित उद्योगांकडून विद्यार्थ्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याशिवाय उच्च शिक्षणाचे मार्गही विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. म्हणूनच दहावीनंतर आयटीआयकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
- सदाशिव खडतरे,
निवृत्त प्राचार्य, शासकीय आयटीआय
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85423 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..