
तरुणांनी राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ः निंबाळकर
पुणे, ता. ३१ : ‘‘तरुणांनी केवळ राजकारणाच्या बाहेर राहून टीका करण्यापेक्षा त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये तळागाळात काय परिस्थिती आहे याची आपल्याला जवळून जाणीव होते. म्हणूनच तरुणांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येथे केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे नऱ्हे येथील कॅम्पसमध्ये आयोजित सहाव्या युवा संसदेच्या समारोपप्रसंगी निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच सुनील जाधवर यांना आदर्श सरपंच, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना आदर्श नगरसेवक, आमदार भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. निंबाळकर यांनाही यावेळी आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पवार म्हणाले, ‘‘आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे केवळ जयजयकार न करता त्यांचे विचार आणि गुण अंगी बाळगले पाहिजेत.’’
तटकरे म्हणाल्या, ‘‘उच्चशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणे ही केवळ समाजाचीच नव्हे तर राजकारणाची ही गरज आहे. चांगले तरुण जर राजकारणामध्ये आले तर निश्चितच राजकारणाला चांगली दिशा मिळून देश घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.’’
--------