
छत्रपतींनी समाजक्रांतीतून नवा राष्ट्रवाद मांडला
पुणे, ता. १९ ः कृषी क्रांतीच्या माध्यमातून अर्थ क्रांती आणि त्यातून समाजक्रांती करत शिवाजी महाराजांनी नवा राष्ट्रवाद निर्माण असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र शिंगणापुरकर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. सोनवणे यांनी जिजामाता यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी ढोल-ताशा पथक, लेझीम यांच्यासह पारंपरिक वेशातील शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली.
बलकवडे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण केले. उद्याच्या सशक्त हिंदुस्तानासाठी त्यांनी दहशतमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, विज्ञानवादी राज्य निर्माण केले. अन्याय करणारा कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्याशी संघर्ष करणे हे आपले आद्य कर्तव्य त्यांनी मानले. त्यांच्या अठरापगड जातींमधील मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य निर्माण केले.’’
शिवरायांविषयी नवा अभ्यासक्रम
आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवणाऱ्या राजांचा अभ्यास सर्वांनी करावा यासाठी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षीपासून विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्व, विचार आणि व्यवहार’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, असे प्र- कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी सांगितले.