‘मविआ’ने पुण्याचा विकास रखडवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मविआ’ने पुण्याचा विकास रखडवला
‘मविआ’ने पुण्याचा विकास रखडवला

‘मविआ’ने पुण्याचा विकास रखडवला

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी पुण्याचा विकास रखडवला, एकही नवा प्रकल्प पुण्याला दिला नाही, कोरोनाकाळात आर्थिक मदत केली नाही. हा सगळा अडीच वर्षांचा अनुशेष आता शिंदे-फडणवीस सरकार भरून काढत आहे. या निवडणुकीत भाजपचा विजय होऊन महाविकास आघाडीचे विसर्जन होईल, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप मित्रपक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रवक्ते कुणाल टिळक, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर या वेळी उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या कसबा मतदारसंघात शरद पवार यांना अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घ्यायला लागतो, यातच महाविकास आघाडीचा पराभव होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्ये थोरात-पटोले अशी फूट आहे, उद्धव ठाकरे गट विरून गेला आहे आणि शरद पवार हे कधीच काँग्रेसला मदत करत नाही, त्यामुळे आमचा विजय निश्‍चित आहे.

सत्तेत असताना गप्प का?
शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली, त्यावर उपाध्ये म्हणाले, ‘‘अडीच वर्षे सत्तेत असताना पवार यांना एमपीएससीचा, एसटी कामगारांचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर, तसेच अनेक एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. पण सत्तेत असताना गप्प बसायचे आणि विरोधात असताना राजकारण खेळायचे हा यांचा जुनाच खेळ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

फडणवीस यांची पदयात्रा
रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता. २३) भिडे पूल परिसरातून पदयात्रा काढणार आहेत. तर शुक्रवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा रोड शो होणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.