
संत निरंकारी मिशनतर्फे ४१ ठिकाणी स्वच्छता
पुणे, ता. २७ ः संत निरंकारी मिशनच्या जयजवाननगर शाखेच्या वतीने संगम घाट येथे रविवारी अमृत परियोजनेंतर्गत ‘स्वच्छ जल- स्वच्छ मन’ अभियानाला सुरवात झाली. सकाळी ७ ते १२ या वेळेत संगम घाट व कात्रज तलावाच्या पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयामध्ये आढळून येणारे शेवाळ काढून पाणी व परिसर स्वच्छ करण्यात आला. यासाठी जाळीयुक्त काठ्यांचा वापर केला.
संत निरंकारी मिशनचे पुणे विभागाचे प्रभारी ताराचंद करमचंदांनी या अभियानाविषयी माहिती देताना म्हणाले, ‘‘देशातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये ११०० हुन अधिक ठिकाणी हे अभियान राबविले. पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हे अभियान राबविले. यात पाच हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. रविवारी पार पडलेल्या अभियानात देशभरातून सुमारे दीड लाखांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी पथनाट्याद्वारे पाण्याचे महत्त्व आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांबाबत माहिती देण्यात आली.’’ यावेळी पांडुरंग सांडभोर, शिवाजी ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.