
बालसाहित्यातून नागरिक घडविणे गरजेचे श्रीराम पवार यांचे मत ; गोविंद गोडबोले यांच्या १०० व्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. ५ ः ‘‘परीक्षाभिमूख यांत्रिक शिक्षणामुळे विचारशून्य, विवेकशून्य आणि भावनाशून्य समाजाकडे आपली वाटचाल होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिक घडविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आपल्याला कशा प्रकारचा नागरिक हवाय, त्यावर आधारित प्राथमिक शिक्षण हवे. बालसाहित्यातून नागरिक घडविण्याचे शिक्षण गरजेचे आहे,’’ असे मत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
बालसाहित्यिकार गोविंद गोडबोले यांच्या १०० व्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोनल गोडबोले लिखित ‘इंद्रधनू्’ पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. केशव साठ्ये, अर्चना कुरतडकर, प्रकाशक जयंत दलाल आदी उपस्थित होते. महिला दिनानिमित्त मोनिका बायगुडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ‘‘लहान मुलांसाठीचे साहित्य पोरकट नसून, अतिशय गंभीरपणाने केलेली कृती आहे,’’ असे मत पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘बालसाहित्याची आणि संस्काराची सध्या प्रचंड गरज आहे. मुलांना काय आवडते, याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व त्यांना काय आवडायला पाहिजे याचे आहे. माणसं आपापल्या सोईने निवडत असत. त्या पलीकडेही काही लिहायला हवे. त्या अनुषंगाने साहित्याला वळण देणे गरजेचे आहे.’’ बालसाहित्यामध्ये वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवेत, असे नमूद करताना गोविंद गोडबोले म्हणाले, ‘‘मुलांना आवडेल ते द्यावे, मुलांना काय आवडायला पाहिजे तेही द्यायला पाहिजे. बालसाहित्यातून संस्कार रुजतात. मुलांची सर्जनशीलता त्यातून जागृत होते.’’ बालसाहित्यासाठीच्या लेखन पद्धतीचा उलगडा गोडबोले यांनी यावेळी केला.
बाल वाड्मय अधिक विकसित करायचे असेल तर ग्रामीण भागातील बाल साहित्याचा विकास होणे गरजेचं आहे. जे मुलांसाठी लिहितात त्यांना शासनाने आणि समाज माध्यमांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
- डॉ. केशव साठये
फोटो ः 28705