‘कसबा’ भाजपचा नव्हे, बापटांचा बालेकिल्ला

‘कसबा’ भाजपचा नव्हे, बापटांचा बालेकिल्ला

पुणे, ता. ७ : ‘‘कसबा विधानसभा मतदारसंघ हा कधीही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला नव्हता. हा मतदारसंघ गिरीश बापट यांचा बालेकिल्ला होता’’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी येथे केले.
कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पवार यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी घेतली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी धंगेकर यांच्या समवेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘‘कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती. त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशिव, शनिवार पेठ हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे, असे अनेक वर्षे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले होते. बापट यांचे वैशिष्ट्य असे की भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी बापट यांनी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता. परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यांनी निर्णय घेतला गेला नाही, अशी कुजबूज ऐकायला मिळाली. ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले ती वर्षानुवर्षे सामान्य लोकांमध्ये वावरते. तसेच हा उमेदवार कधीच चार चाकीत बसत नाही तर दोन चाकीवाला आहे. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचे लक्ष यांच्याकडे आहे. तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक याठिकाणी मनापासून राबले याचा हा परिणाम आहे असे आमचे निरीक्षण आहे.’’ या निवडणुकीत भाजपने वाटलेले पैसे आणि केलेले गैरप्रकार हे पारंपारिक मतदारांना अजिबात आवडलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय. त्यामुळे उद्याची विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा प्रयत्न असेल, असेही पवार यांनी सांगितले.

शेतकरी योग्य वेळी निर्णय घेतील
नाशिकच्या मनमाडच्या शेतकऱ्यांनी माझ्याशी बोलणे केले. त्यामध्ये कांदा खरेदी योग्य पद्धतीने सुरू नाही. कांद्याचे पडलेले भाव सावरण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. राज्य आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतले ते योग्य नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्याअर्थी अजूनही भावात सुधारणा होत नाही, याचे दुःख शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याची किंमत शेतकरी योग्य वेळी वसूल करतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com