
संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचे सरकारचे संकेत
मुंबई, ता १३ : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत रात्री उशिरा झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गरज भासल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती नेमली असतानाही संपावर जाणे योग्य नसल्याचे मत सरकारमध्ये व्यक्त केले जाते आहे. १४ मार्चपासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारचे सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस सरकारला दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम सहाच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदा ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र सरकारने ‘काम नाही-वेतन नाही’ हे धोरण राज्य सरकारही अनुसरत आहे. याबाबत सरकारने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही भांगे यांनी म्हटले आहे.