
वाहनांच्या वेगाची मर्यादा महामार्गावर वाढवू नका
पुणे, ता. १६ ः देशात रस्ते अपघातांत मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एकूण अपघातांपैकी ७० टक्के अपघात अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे होत असल्याचे परिवहन मंत्रालयाचा अहवाल सांगतो. असे असताना राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वेगाची मर्यादा वाढविण्याचा विचार सुरु आहे. तसे झाल्यास अपघाताची संख्या वाढेल. हे लक्षात घेऊन वेगाची मर्यादा वाढवू नये, अशी मागणी परिसर संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम संयोजक संजय गायकवाड यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
देशांत चांगल्या दर्जाचे रस्ते होत आहेत. चांगल्या दर्जाची वाहने रस्त्यांवर धावत आहे, असे सांगून परिवहन मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या वेगाची मर्यादा वाढविण्याच्या तयारीत आहे. पूर्वी राष्ट्रीय महामार्गावर ताशी १०० किमी वेगाची मर्यादा होती. ती वाढवून आता ताशी १२० केली आहे. परिवहन मंत्रालय आता ताशी १४० किमी वेगाचा विचार करीत आहे. तसे झाल्यास अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होईल. परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये देशांत झालेल्या अपघातांत एक लाख सात हजार २३६ नागरिकांचा बळी गेला आहे. हा आकडा गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठा आहे. तेव्हा महामार्गावर वेगाची मर्यादा वाढवू नये, तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाची निर्मिती जलद करणे आदी मागण्या नितीन गडकरी यांच्याकडे केल्या आहेत.