रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा
रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा

रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ : जिल्ह्यातील हायब्रीड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरु आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामाला गती देऊन मेअखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, संग्राम थोपटे, संजय जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह रस्ते ठेकेदार, अधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘रस्ते कामातील अडचणीसंदर्भात अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करून मार्ग काढावा. अडचणी तातडीने सोडवून रस्ते कामांना गती द्यावी. सामान्य जनतेसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. रस्त्यांची वर्दळ, अपघातात वाढ होत असल्याने भूसंपादन सक्तीने करणे अपरिहार्य आहे का हे अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावे. रस्त्यांच्या कामांसाठी आवश्‍यक निधी त्वरित उपलब्ध करून दिला जाईल.’’
खानापूर ते पानशेत यादरम्यान आवश्‍यकता असलेल्या ठिकाणी लहान पुलांची उभारणी १५ दिवसांत पूर्ण करावी. पुणे-खडकवासला दरम्यान वन जमिनीची समस्या दूर करून नांदेड सिटी ते किरकटवाडी फाट्यादरम्यान तीन लहान पूल मंजूर असून त्याचे कामही गतीने करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.

तांत्रिक बाबींमुळे अडचण
वेल्हे तालुक्‍यातील तोरणा किल्ल्याकडे जाणारा महाड-मढेघाट चेलाडी रस्ता, खानापूर ते पानशेत रस्ता, हवेली तालुक्‍यातील सिंहगड किल्ल्याकडे जाणारा डोणजे कोंढणपूर-खेड शिवापूर रस्ता आणि पुरंदर तालुक्‍यातील पुरंदर किल्ल्याकडे जाणारा रस्ता सासवड-कापूरहोळ या रस्त्यांची कामे तांत्रिक बाबीमुळे काही ठिकाणी झालेली नाहीत. सासवड गाव ते कापूरहोळ रस्त्यासाठी नवीन निविदा मागवून काम करावे. हे काम ४० दिवसांत पूर्ण करावे. पौड-कोळवण-लोणावळा-कालेगाव २०० मीटर रस्ता डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचा करावा, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
............