‘काय द्यायचे’ बोला
‘कायद्या’चे सोडा...

‘काय द्यायचे’ बोला ‘कायद्या’चे सोडा...

‘‘गुरुजी, गृहपाठाच्या वहीत तुम्ही काय शेरा लिहिलाय? वाचता येईना म्हणून विचारले.’’ आमच्या लहानपणीची तिसरीतील घटना पाचवीतील मुलाला, पार्थला सांगू लागलो.
त्यावर गुरुजी म्हणाले, ‘‘मुर्खा, ‘अक्षर सुवाच्च काढ’ असं लिहलंय.’’ त्यावर आम्ही म्हणालो, ‘‘गुरूजी, मला वाटलं, ‘उद्या सुटी आहे’ असं लिहलंय. आधी मला वाटलं, घरातील कोंबडी वहीवर नाचून गेली की काय?’’ आम्ही असं म्हटल्यावर गुरूजींनी छड्या मारल्या.
‘‘पण बाबा, तुमचं बरोबर असूनही तुम्ही छड्या का खाल्ल्यात? आम्ही तुमच्या जागी असतो तर मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या असत्या. शिवाय पालकांना बोलावून, शिक्षकांना माफी मागायला लावली असती.’’ पार्थचे बोलणे ऐकताच आम्हाला घाम फुटला.
‘‘अरे बाबा, शिक्षक आपल्या भल्यासाठीच शिक्षा करतात. ‘छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’ असं म्हटलं जाई. त्यामुळं ज्ञान मिळवण्यासाठी छड्या खाल्ल्याच पाहिजेत, असं आम्हाला वाटायचं.’’ आम्ही पार्थला समजावून सांगितलं.
‘‘आमच्या हातून काही चुकल्यावर गुरुजी कान पिरगाळायचे. त्यामागे काही खोटं ऐकून, त्यावर विश्वास ठेवत जाऊ नकोस, हा संदेश असायचा. भिंतीकडे तोंड करून उभे राहा, ही शिक्षा दिली जायची. त्यामागे स्वतःला ओळखून आत्मपरीक्षण करा, हाच उद्देश असायचा. शिक्षा म्हणून आम्हाला फळा पुसायला सांगितलं जायचं, त्यामागेही ‘झालं गेलं विसरून जा. नव्याने सुरवात करा’ असा संदेश असायचा.’’
‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ही सामुदायिक शिक्षा वाटायची. त्यामागे वायफळ बडबड न करता, शांतपणे परिस्थितीचा अभ्यास करून, प्रश्न मार्गी लावा, हा विचार असायचा. ‘बाकावर उभे राहा’ अशी एक शिक्षा अधून-मधून असायची. ‘तुम्हाला जे दिसतंय, त्याच्या पलीकडं बघण्याचा सराव करा. उच्च आणि मोठी स्वप्ने बघा,’ हा हेतू त्यामागे असायचा.’’
‘‘आम्ही शाळेत उशिरा आलो तर हमखास वर्गाबाहेर थांबण्याची शिक्षा दिली जायची. त्यामागे ‘चार भिंतीच्या पलीकडचं जग बघा, चुका कबूल करून, त्याचं प्रायचित्त घ्या आणि नव्या जोमानं जगायला शिका,’ हाच धडा गुरुजी आम्हाला द्यायचे.’’
‘‘बाबा, लहानपणी कोणत्या शिक्षा तुम्हाला दिल्या जायच्या.’’ पार्थने उत्सुकतेने विचारले.
‘‘अधूनमधून गुरुजी आमच्या पोटाला चिमटा घ्यायचे. त्यामागे पोटाला जेवढं लागतंय, तेवढं कमवा. जास्तीची हाव धरू नका. आम्ही गैरमार्गाने जाऊन, पैसा कमवू नये, यासाठीच हा चिमटा होता. उठाबशा काढणे, कोंबडा व्हायला सांगणे, यामागे आमची शारीरिक तंदुरुस्ती वाढावी, सहनशक्ती वाढावी, हेच गुरूजींचे हेतू होते, हे आज कळतंय. तुम्हाला कोणत्या शिक्षा असतात?’’ आम्ही उत्सुकतेने विचारले.
‘‘शिक्षा कोठल्या? काही झालं तर पालकांना बोलवतात. कदाचित आम्हाला काहीही थेट सांगायला शिक्षक घाबरत असावेत.’’ पार्थने सांगितले.
‘‘तू स्वतःला व्हीआयपी समजतोस काय?’’ आम्ही रागाने म्हटले.
‘‘आहेच मी व्हीआयपी. आमच्या मिस अनेकदा मला चॉकलेट वगैरे देतात. ‘मी शांत बसावं, म्हणून मिस ही आयडिया करतात’, असं बाकीची मुलं म्हणतात पण मला विशेष वागणूक देत असल्यामुळे ते माझ्यावर जळतात. अहो, उगंच का परीक्षेच्या वेळी तीन-चार शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूलाच उभे राहतात. अगदी झेड सिक्युरिटीच असते.’’ पार्थने म्हटले.
‘‘तुझ्यावर फटकेच टाकायला पाहिजेत.’’ त्याचं बोलणं ऐकून आम्ही रागाने म्हटलं. त्यावर पार्थ खवळला.
‘‘बाबा, कायद्याने तुम्हाला अशी शिक्षा करता येणार नाही. बालहक्क समितीकडे मी तुमची तक्रार करीन.’’ पार्थने आम्हाला धमकी दिली आणि आमच्या डोळ्यांसमोर आमचे गुरुजी आणि आई-वडिल उभे राहिले. पोरगं सुधारण्यासाठी फटके टाकणे, हेच रामबाण औषध त्यांच्याकडे होते आणि याबाबतची तक्रार आम्ही कोणाकडे केली नाही. आज त्याच रामबाण औषधामुळे आम्ही सुधारलो आणि स्वतःच्या पायावर उभे आहोत, याची जाणीव झाल्याने आमचे डोळे नकळत पाणावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com