टपाल खात्यात अधिकाऱ्यांकडून २४ लाखांचा गैरव्यवहार

टपाल खात्यात अधिकाऱ्यांकडून २४ लाखांचा गैरव्यवहार

पुणे, ता.२५ : टपाल खात्यातील मुदत ठेव आणि सुकन्या योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रकमेवरील २४ लाख रुपयांच्या परताव्याचा टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनीच गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. टपाल विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी कॅम्प टपाल कार्यालयातील घडलेल्या प्रकाराबाबत टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर (वय ४२, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी कॅम्प टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर ज्योतिराम माळी (वय ४०, फॉर्च्युन सृष्टी, येवलेवाडी), लिपिक भगवान नाईक (वय ३६, रा. गणेश हाउसिंग सोसायटी, दिघी, आळंदी रस्ता), विश्रांतवाडी भागातील धानोरी टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर गणेश लांडे (वय ३०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), पोस्ट मास्तर मधुकर सूर्यवंशी (वय ४९, रा. भैरवनगर, धानोरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०१८ ते ऑगस्ट २०२० दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रस्त्यावरील दिघी कॅम्प टपाल कार्यालयात २७४ ठेवीदारांनी नऊ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपयांचे मुदत ठेव योजनेनुसार गुंतवणुक केली होती. आरोपी माळी, नाईक, लांडे, सूर्यवंशी यांनी ही रक्कम मुदत ठेव योजनेत जमा न करता नवीन खाते काढून धानोरीतील टपाल कार्यालयात जमा केली. त्या रकमेवर त्यांनी १८ लाख ३५ हजार ११५ रुपये परतावा मिळवून फसवणूक केली. ठेवीदारांच्या बनावट सह्या करून त्यांनी टपाल खात्याची फसवणूक केली आहे.

खातेपुस्तिकेवर बनावट नोंद
तर विमानतळ पोलिस ठाण्यात ज्योतिराम माळी, रमेश भोसले (रा. साळुंके विहार रस्ता, वानवडी) आणि विलास एच. देठे (वय ५९, रा. वानवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळी आणि भोसले यांनी ५९ ठेवीदारांकडून दोन कोटी ४७ लाख ६० हजार रुपये स्वीकारली. या रकमेवर मिळालेल्या चार लाख ९५ हजार २०० रुपयांच्या परताव्याचा आरोपींनी अपहार केला. देठे याने ठेवीदार तसेच सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम स्वीकारली. ठेवीची रक्कम स्वीकारण्यात आल्याची बनावट नोंद खातेपुस्तिकेवर केली. मात्र, टपाल खात्याच्या फिनकॅप संगणकीय प्रणालीत नोंद केली नाही. ठेवीदारांनी जमा केलेल्या ४५ हजार ९०० रुपये रक्कमेचा अपहार केला. या गुन्ह्यातदेखील वीर यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही प्रकारात एकूण २३ लाख ७५ हजार ३१५ रुपयांची फसवणूक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com