महिला नसलेले छोटे मंत्रिमंडळ योग्य वाटत असावे - अजित पवार यांचा टोला

महिला नसलेले छोटे मंत्रिमंडळ योग्य वाटत असावे - अजित पवार यांचा टोला

महिला नसलेले छोटे मंत्रिमंडळ पुरेसे असावे
अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस यांना टोला

पुणे, ता. ५ : मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही, करायचा असल्यास कधी हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, असे स्पष्ट करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, ‘महिलांना प्रतिनिधित्व नसलेले वीस जणांचे छोटे मंत्रिमंडळ त्यांना कदाचित पुरेसे वाटत असेल,‘ असा टोला लगावला.
पुण्यात लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोमवारी जालना, शिरूर आणि भिवंडी या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. अनिल देशमुख, प्रफुल पटेल आज येऊ न शकल्याने विदर्भातील जागांचा आढावा १४ जून रोजी मुंबईतील बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणावरून केलेल्या टीकेचा समाचार त्यांनी घेतला. ‘सत्ताधारी पक्षाने आमच्याबाबत चांगले बोलले पाहिजे ही अपेक्षाच कशी करता,‘ असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सरकारनेच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले. मध्य प्रदेश सरकारच्या तरतुदींचा अभ्यास करून बांठिया आयोग नेमला. या आयोगाच्या अहवालाला अनुसरून भूमिका मांडण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला तो सर्वांना माहीत आहे.‘ राज्यात नवे सरकार येऊन एक वर्ष उलटले तरी या काळात सरकारने काय केले. निवडणुका का घेतल्या नाहीत, अशा प्रश्नांच्या फैरी त्यांनी झाडल्या. मंडल आयोगाची अंमलबजावणी राज्यात शरद पवार यांनी केली. आम्ही कोणत्या निवडणुका समोर ठेवून निर्णय घेत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईसाठी मोर्चेबांधणी
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर आमचा प्रभाव कमी आहे, पण तेथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळावे म्हणून त्यांच्यासोबत असल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणी संबंधित जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, आपल्या मतांची विभागणी होऊ नये अशी सूचना दिल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
---

शिंदे-फडणवीस यांची दिल्ली वारी सतत सुरू असली तरी कोणी कुठल्याही वाऱ्या करो, सुरत वारी करो, गुवाहाटी वारी करो... आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची वारी महत्त्वाची आहे.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com