पुण्यात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत
पुण्यात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत

पुण्यात रोज एक कोटी लिटर पाण्याची बचत

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेत ४० टक्के पाण्याची गळती होत असताना समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसविण्यात आले. त्यामुळे रोज एक कोटी लिटर पाण्याची होणारी गळती थांबविण्यात यश आले आहे, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे. दरम्यान पाणी मीटरचा तुटवडा कमी झाल्याने मीटर बसविण्याचे काम सुरू झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.

शहरातील सर्व भागांत समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे २४०० कोटी रुपये खर्च करून समान पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. पाच वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असून, ते ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत तीन लाख १८ हजार मीटर बसविले जाणार आहेत. त्यापैकी एक लाख १० हजार मीटर बसवले आहेत. वर्षभरापासून मागणीप्रमाणे मीटर उपलब्ध नव्हते. आता ते उपलब्ध होत असल्याने या कामाला गती येईल, असे प्रशासनाने सांगितले.

गळती शोधण्यास मदत
पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्पातून रोज १४७० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, पण यात ४० टक्के गळती होते. महापालिकेने बंगले, सोसायट्यांत एक लाख १० हजार मीटर बसवलेच. तसेच मुख्य जलवाहिन्यांवर २५० बल्क मीटर बसविले आहेत. त्यातून पाणी गळती शोधण्यास मदत झाली. मुख्य जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे मीटर रिडिंगवरून समोर आल्याने तेथे दुरुस्ती केली आहे. परिणामी, रोज एक कोटी लिटर पाण्याची नासाडी थांबविली आहे.


पर्वती प्रकल्प पाडणार
महापालिकेचे पर्वती जुने जलशुद्धीकरण केंद्र ५० वर्षे जुने आहे. त्यावर निम्म्या शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. आता या प्रकल्पाशेजारी ३५० एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सुमारे १२५ कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. याबाबतचा प्रस्ताव पूर्वगणन समितीपुढे येणार असल्याचे विक्रमकुमार यांनी सांगितले.

सोसायट्या, बंगल्यांना पाणी मीटर बसविल्यानंतर लगेच त्यानुसार बिल येणार नाही. पण यानिमित्ताने पाण्याचा हिशोब ठेवणे शक्य होत आहे. जलकेंद्रातून सोडलेले पाणी नागरिकांपर्यंत किती येते, हे मीटरमुळे लक्षात येते. मीटरमधून चोरी, गळती व अन्य कारणांमुळे दररोज होणारी गळीत थांबविल्याने रोज एक कोटी लिटर बचत करण्यात यश आले आहे. ज्या भागात मीटर बसवलेले नाहीत, तेथे मीटर बसवले जाणार आहेत.
- विक्रम कुमार,
आयुक्त, पुणे महापालिका