
पीएमपी थांब्यावरील दिव्यांच्या सेटिंगमध्ये होते छेडछाड
पुणे, ता. ३ : स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गातील बस थांब्यावर बसविलेले स्वयंचलित दिवे दुपारी सुरु आणि रात्री बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी बसमध्ये चढताना व उतरताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अंधारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
पीएमपी प्रशासनाने स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गातील १० थांब्यावर स्वयंचलित दिव्यांची यंत्रणा बसविली आहे. संध्याकाळी सहा वाजता दिवे लागतात तर पहाटे सहा वाजता दिवे बंद होतात. यासाठी तिथे टायमर बसविले आहेत. पूर्वी दिवे लावण्यासाठी व बंद करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आता मात्र कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही. पीएमपीने सुरु केलेली सोय चांगली असली तरी स्व.राजीव गांधी उद्यान बसथांबा, पद्मावती व भापकर पंप बस थांब्यावरील दिवे बंद होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
काही अज्ञात व्यक्ती टायमरशी छेडछाड करीत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे असा प्रकार घडत आहे. आम्ही त्या टायमरला लॉक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडणार नाही.
अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक, पीएमपी, पुणे.