
जलजीवन मिशन अंतर्गत २८३ पाणी पुरवठा योजना पूर्ण
पुणे, ता. १५ : पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजीपी) ‘जलजीवन मिशन योजनें’तर्गत २८३ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च या योजनेसाठी झाला आहे.
सर्वाधिक १६८ योजना पुणे जिल्ह्यात राबविल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात १५ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे.
पुणे विभागातील ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ या अभियानांतर्गत नव्या आणि जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन करणे अशा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, क्षमतावाढ किंवा दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबविण्यास कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत.
तसेच या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनी दिली.
पुणे विभागात गेल्या आर्थिक वर्षात झालेली कामे
जिल्हा झालेली कामे झालेला खर्च
पुणे १६८ ४० कोटी ८० लाख
सातारा ४९ ६७६ कोटी ९९ लाख
सांगली २८ ५०० कोटी
सोलापूर २३ ७६० कोटी १५ लाख
कोल्हापूर १५ ६१६ कोटी २० लाख