
देशाची अर्थव्यवस्था २०४९ मध्ये ३५ ट्रिलीयनची होईल ः तलाठी
पुणे, ता. ३० : ‘‘भारताची सध्याची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलीयन इतकी आहे. २०४९ मध्ये ती ३५ ट्रिलीयनची होईल, असा अंदाज आहे. त्यावेळीच गरज लक्षात घेऊन सीएंच्या संख्येचा (सनदी लेखापाल) अंदाज बाधून आतापासूनच त्यांची पायाभरणी करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांनी केले.
‘आयसीएआय’ संस्था पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात तलाठी बोलत होते. या वेळी केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, पुणे आयसीएआयचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, काशिनाथ पठारे, सचिन मिनियार, प्रणव आपटे, प्रितेश मुनोत आदी उपस्थित होते. तलाठी म्हणाले, “सीएंचा व्यवसाय केवळ अकाउंटिंग आणि ऑडिटींगपुरता मर्यादित न राहता तो व्यापक बनला आहे. विविध नवे कायदे, सॅप, इआरपी, एआय, ब्लॉकचेनसारखे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून ‘सेल्फ पेस लर्निंग मॉडेल’ तयार करण्यात येत आहे.’’ अग्रवाल यांनी स्वागत मनोगत व्यक्त केले. अजिंक्य रणदिवे यांनी प्रास्ताविकात इन्स्टिट्यूटसंबंधी माहिती दिली. हृषीकेश बडवे यांनी सूत्रसंचालन केले. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.