भारत २०४७ पर्यंत विकसित देश

भारत २०४७ पर्यंत विकसित देश

पुणे, ता. १५ ः ‘‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरच्या दिशेने प्रवास सुरू आहे. आज भारतात रायफलपासून ते ब्राह्मोस क्षेपणास्त्रांपर्यंत आणि हलक्या लढाऊ विमानापासून स्वदेशी जहाजापर्यंत सर्व काही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे लहान-मोठ्या अशा प्रत्येक तंत्रज्ञानात आपण पुढे येत आहोत. अशाच प्रकारे आपण आपल्या क्षमतांचा वापर केल्यास येत्या २०४७ पर्यंत भारत हा जगातील विकसित देश म्‍हणून उदयास येईल. तसेच अर्थव्यवस्थेतही आपण पुढे असू, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अंतर्गत येणाऱ्या खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) बाराव्या दीक्षान्त सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, ‘डीआयएटी’चे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन आदी उपस्थित होते. यावेळी ‘डीआयएटी’च्या २८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यातील २६१ विद्यार्थी हे एम.टेक आणि एम.एस्सीचे तर २२ पीएच.डी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच २० विद्यार्थ्यांना यावेळी सिंह यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
कामत म्हणाले, ‘‘विविध क्षेत्रातून पदवी मिळविल्यावर त्‍याचा देशासाठी कसा उपयोग होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर भारताला तांत्रिक क्षेत्रातील नेतृत्‍व करणारे देश म्‍हणून स्थापित करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाचे आहेत.’’
दीक्षान्त सोहळ्यानंतर सिंह यांनी ‘डीआयएटी’मध्ये केलेल्या विविध आघाडीवरील संशोधन प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बायोमेडिकल हेल्थ-केअर उपकरण, ड्रोन इंटरसेप्शन आणि लढाऊ तंत्रज्ञान, न्यूक्लिअर डायमंड बॅटरी आदींचा समावेश होता.

‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर भर’
मागील काही दशकांमध्ये जागतिक पातळीवर मोठे बदल घडत असून यामध्‍ये सर्वाधिक वेगाने युद्धाचे स्‍वरूप बदलत आहे. पारंपरिक युद्धाच्या धोक्यांबरोबरच आता सायबर आणि अवकाश डोमेनमधील धोक्यांचा ही सामना करावा लागत आहे. त्यात ‘कॉन्टॅक्टलेस’ युद्धाचे स्वरूप यामुळे संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित होत आहे. अशात आपल्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान असलेले शत्रू देश हे आपल्या देशासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. यासाठी अशा आव्हानांना तोंड देण्याऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नावीन्याची गरज असल्याचे सिंह यांनी नमूद केले.

संरक्षणमंत्री म्हणाले...
- भारत हे स्टार्टअप्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे केंद्र असून संरक्षण मंत्रालयाला या माध्यमातून सातत्याने नवनवीन कल्पना मिळत आहेत
- भारतीय स्टार्टअप्स संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या प्रयत्नात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे
- संरक्षण निर्यातीत अलीकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली
- २०२२-२३ या आर्थिक वर्षात १६ हजार कोटी रुपयांपर्यंतचे निर्यात
- भारत अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत असून अनेकांनी देशाच्या उत्पादन क्षमतांमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला
- संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांसाठी ४११ यंत्रणा/उपकरणे असलेल्या स्वदेशीकरण याद्या जाहीर केल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com