
‘लवकर निवडणुका होण्यासाठी न्यायालयात गेलो; बिघडलं कुठं?’
पुणे, ता. १९ : ‘‘२०२१ ची जणनगना झाली नाही. परंतु दरम्यानच्या काळात लोकसंख्या वाढली, महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट झाली. साहजिकच लोकप्रतिनिधींची संख्या वाढली गेली पाहिजे. परंतु त्या विरोधात आताचे सत्ताधारी पक्ष न्यायालयात गेले,’’ असे सांगून ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, यासाठी न्यायालयात गेली. मग बिघडलं काय,’’ असा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महापालिका निवडणुकांना विलंब होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य यावे, अशी पक्षाची भूमिका आहे. आज सव्वावर्ष झाले. लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही.’’
अशोक टेकवडे यांच्या भाजपप्रवेशावर ‘‘अरे बापरे, आता आमचे काही खरे नाही’’ अशी प्रतिक्रिया देऊन पवार म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात आता मला जिवाचे रान करावे लागेल. त्यांना आम्हीच आमदार केले. ते माजी झाले म्हणून तुम्ही महत्त्व देत आहात. आम्ही त्यांना बँकेचे चेअरमन केले, त्यांचे काही प्रश्न आहेत. ते येथे सांगणे योग्य नाही. त्यांच्या गावात सरपंचपदावर त्यांचा माणूस करता आला नाही, म्हणून हे महाराज नाराज झाले आणि गेले. दिल्या घरी सुखी राहा.’’