
जिल्ह्यात ४२ गावांत टँकरने पाणीपुरवठा
पुणे, ता. २२ : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. १३ तालुक्यांतील ४२ गावांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापैकी केवळ तीन शासकीय टँकर असून उर्वरित ३० खासगी टँकर सुरू आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. परिणामी यंदा विलंबाने टँकरची गरज भासली. मे महिन्यात मात्र दरवर्षीप्रमाणे उन्हाचा चटका जाणवण्यास सुरवात झाली. त्यामुळे १३ तालुक्यांमधील ४२ गावांमधील ६६ हजार ६०९ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सर्वाधिक जुन्नरमधील १३ गावांत २३ हजार १९४ नागरिकांना ११ टँकरने पाणी देण्यात येत आहे. त्याखालोखाल खेडमध्ये १७ गावांतील २२ हजार ७०६ नागरिकांना नऊ, आंबेगावात २० हजार १४८ नागरिकांना १२, तर भोरमध्ये दोन गावांत ५६१ नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात २७ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.