भरती प्रक्रियेत ग्रामिण विद्यार्थी मागे!

भरती प्रक्रियेत ग्रामिण विद्यार्थी मागे!

पुणे, ता. ३० ः दुर्गम भागात राहणारा राजेश शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी शहराच्या ठिकाणी दाखल होतो. यंदा ऑनलाइन परीक्षा असल्यामुळे परीक्षा केंद्र नेहमीपेक्षा लांब आणि अपरिचित ठिकाणी होते. तारेवरची कसरत करत, तो परीक्षा केंद्र गाठतो खरा. पण अर्ध्या मुलांचे अजून रजिस्ट्रेशन बाकी असल्याने त्याचा बराचसा वेळ वाया जातो. त्यात प्रथमच संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवायची असल्याने तो काहीसा गडबडतोही. दिलेले प्रश्न आणि उपलब्ध वेळ याचे गणित काही केल्या बसत नाही. नवीन परीक्षा पद्धत आणि तांत्रिक अडचणींमुळे इतर मुलांच्या तुलनेत तो जरासा मागेच पडतो. केवळ राहुलच नाही तर राज्यातील अनेक उमेदवारांना ऐन अटीतटीच्या लढाईत अशा अडचणींचा सामना कराला लागत आहे.
देशभरातील बहुतेक भरती प्रक्रिया आता ऑनलाइन परीक्षांद्वारे पार पडत असून, तांत्रिक बाबतीत उमेदवारांच्या अपुऱ्या तयारीमुळे एकंदरीत मुल्यमापणावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष करून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये तुलनेने जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतीच ‘टेट’ची परीक्षा देणारी पल्लवी धाडगे सांगते, ‘‘आम्ही दिलेल्या परीक्षेतील मराठी प्रश्न गुगल ट्रान्सलेट करून वापरले होते. त्यात स्क्रीनवरील सर्व पर्याय पाहण्यासाठी स्क्रोल करण्यास अधिक वेळ लागत होता. गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसाठी रफ कागदावर सोडविण्यास वेळ लागत होता.’’ भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा निकोप पद्धतीने पार पडण्यासाठी उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि सराव पूर्ण करणे गरजेचे आहे. तरच त्यांच योग्य मूल्यमापन होत सर्वांना समान न्याय मिळेल.

उमेदवारांसमोरील अडचणी...
- संगणकावरील प्रश्न सोडविण्याचा सराव नाही. कच्च्या कागदावर गणिते सोडविण्यास अधिक वेळ लागतो
- संपूर्ण प्रश्न आणि उत्तर वाचताना स्क्रोल करावे लागते. त्यात वेळ जातो. तसेच अनेकदा कनेक्टिव्हिटी आणि संयंत्रातील दिरंगाईमुळे वेळ निघून जाते.
- काही मिनीटे आधीच घड्याळ सुरू होते
- केंद्रीय पद्धतीच्या परीक्षांचा पुरेसा सराव नाही

उपाय काय?
- तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उमेदवारांचा अधिक सराव आवश्यक
- परीक्षेसाठी दिलेल्या वेळेचे योग्य नियोजन आवश्यक
- तांत्रिक अडचणींसाठी तातडीने साहाय्य हवे
- उमेदवारांनी अधिक जागृती करणे आवश्यक आहे
- केंद्रीय भरती परीक्षांच्या पद्धतीने अभ्यास करावा

परीक्षा कठीण आहेत, असे आमचे म्हणणे नाही. परंतु, ७५ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पूर्ण प्रश्न सोडवूच शकले नाही तर गुणवत्ता कशी समजणार? संगणकातील परीक्षेची तांत्रिकता, पुरेसा वेळ आणि प्रशिक्षणाचा विचार भरती प्रक्रियेत करायला हवा.
- जयश्री चौधरी, वाशीम

राज्यातील बहुतेक विद्यार्थी अजूनही पारंपारिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असून, त्यांनी आता केंद्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षांचा अधिक सराव करायला हवा. तंत्रज्ञान अवगत करण्याबरोबरच उमेदवारांनी परिक्षा पद्धती अधिक समजून घेणे गरजेचे आहे.
- विकास सिंदाळकर, सरळसेवा भरती मार्गदर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com