
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
पुणे, ता. ३० ः राज्यात कमाल तापमानात झालेली वाढ यामुळे उन्हाच्या झळा कायम असून विदर्भात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. शुक्रवारी (ता. ३१) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सध्या छत्तीसगड ते विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रणालीमुळे वाऱ्याचा प्रवाहदेखील खंडीत होत असून नैर्ऋत्य राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. यातच आणखीन एका हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती ही पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ते उत्तर ओडिशापर्यंत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी (ता. ३०) विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा ३७ अंशांच्या पुढे, तर ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे पारा ४० अंशांच्या दरम्यान होता. दरम्यान, निचांकी तापमानाची नोंद सातार येथे १३.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा घट नोंदली जात आहे. दरम्यान पावसासाठी पोषक वातावरणाच्या निर्मितीमुळे पुढील दोन दिवस विदर्भात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
येथे पावासाची शक्यता ः गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर