अतिवृष्टीग्रस्तांना ७३ कोटींची नुकसान भरपाई

अतिवृष्टीग्रस्तांना ७३ कोटींची नुकसान भरपाई

पुणे, ता. २ : पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अतिवृष्टीमध्ये किमान ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने या नुकसान भरपाईचे वाटप सुरु केले असून आतापर्यंत ८० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. याचा जिल्ह्यातील ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी सांगितले.
यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४ गावांतील १ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ७० लाख ७० हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे.

मंजूर झालेली नुकसान भरपाई
भोर तालुका - ५२३ शेतकरी - २३ लाख १० हजार
वेल्हे तालुका - ११ शेतकरी - ३९ हजार
मावळ तालुका - ११४ शेतकरी - ३ लाख २६ हजार
हवेली तालुका - ७,४९० शेतकरी - ८ कोटी ३३ लाख २ हजार
खेड तालुका - १,९४७ शेतकरी - २ कोटी २ लाख २३ हजार
आंबेगाव तालुका - ९,७७९ शेतकरी - ४ कोटी ९६ लाख ६९ हजार
जुन्नर तालुका - २२,५९१ शेतकरी - २४ कोटी ५१ लाख ४६ हजार
शिरूर तालुका - ४,७३४ शेतकरी - ४ कोटी ५६ लाख ६६ हजार
पुरंदर तालुका - २७,८४१ शेतकरी - २१ कोटी २६ लाख ५७ हजार
दौंड तालुका - २,८ शेतकरी - २ कोटी १४ लाख ८० हजार
बारामती तालुका - ८,४१७ शेतकरी - ५ कोटी ५२ लाख २० हजार

क्षेत्र, पीक प्रकारानुसार वाटप
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या पिकांसाठी क्षेत्र आणि पिकांच्या वर्गवारीनुसार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यानुसार जिरायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ११ हजार ६०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

प्रति शेतकरी सरासरी ८६१४ हजार
जिल्हा प्रशासनाच्यावतीने सध्या वाटप करण्यात येत असलेल्या नुकसान भरपाईपोटी ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपयांची भरपाई ही ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात प्रति शेतकरी सरासरी ८ हजार ६१४ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

किमान सरासरी तीन हजारांची
ही नुकसान भरपाई कमाल दोन हेक्टर क्षेत्रापुरती मर्यादित असून किमान क्षेत्राची मर्यादा निश्चित नाही. त्यामुळे अगदी पाच आर (गुंठे) क्षेत्रावरील नुकसानीसाठीही ही भरपाई दिलेली आहे. यानुसार प्रति शेतकरी किमान सुमारे तीन हजार रुपयांचे हे अनुदान मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com