
उपाययोजनांमुळे पाणी पुरवठा सुरळीत
पुणे, ता. २६ ः जलवाहिन्यांवर बसविलेले एअर वॉल्व्ह, दक्षिण पुण्यासाठी पाणी बंदच्या केलेल्या स्वतंत्र नियोजनामुळे गुरुवारी शहरातील पाणी बंद असले तरी शुक्रवारी बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. मात्र बुधवार पेठ, धानोरकर कॉलनी, हिंगणे, नरवीर तानाजी वाडी, दत्तवाडी, औंध गावासह इतर भागात पाणी न येणे, पाणी कमी दाबाने येणे अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.
पाणी बचतीसाठी महापालिकेने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणारा दक्षिण पुण्याचा भाग वगळता इतर भागात दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर शुक्रवार, शनिवार व रविवारी शहराच्या बहुतांश भागात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठली होती. या अनुभवावरून या आठवड्यात पाणी बंदच्या नियोजनात बदल केला. त्यात बहुतांश नागरिकांना दिलासा मिळाला. प्रभात रस्ता, शिवाजीनगर गावठाण, कर्वेनगर, वारजे, माळवाडी या भागात कायम त्रास असतो, तेथे आज पाणी पुरवठा सुरळीत झाला असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारी
एकीकडे महापालिका पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगितले जात असले तरी रास्ता पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, सदाशिव पेठेचा काही भाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोंढवा, शनिमंदिर, दत्तवाडी, साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा, सॅलिसबरी पार्क, बालेवाडी, गणेशखिंड रस्ता भागात पाणी न येणे, कमी वेळ येणे, कमी दाबाने पाणी आल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
आज सकाळी कमी दाबाने व अवघे पाऊस तास पाणी आले होते. त्यामुळे गैरसोय झाली. त्याची महापालिकेकडे तक्रार केली आहे.
- अक्षय शिंदे, बुधवार पेठ
महापालिकेने एअर वॉल्व्ह बसवले, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. त्यामुळे बऱ्यापैकी पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. ज्या भागात अडचणी आहेत, तेथे उपाययोजना केल्या जात आहेत.
- अनिरुद्ध पावसकर,
प्रमुख, पाणी पुरवठा विभाग