
मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप
पुणे, ता. २६ : ‘‘जांबुवंत, जरासंध, हनुमंत, भीम, रावण, कृष्ण हे सगळे मल्ल होते. सगळ्यांच्या विद्येमध्ये प्रचंड ताकद होती. त्यांच्याकडे कुस्ती किंवा संरक्षणाची विद्या होती. या विद्येतील किरकोळ विद्या पूर्वेकडे गेली आणि त्याचे कराटे आणि कुंफूमध्ये रूपांतर झाले. अशा अनेक मल्लविद्या आपल्याकडे आहेत. योग्य विद्यार्थी नसल्याने कालांतराने मर्मसूत्र, कृष्णी सारख्या काही विद्या लुप्त झाल्या’’, असे मत इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप शारदा गजानन मंदिरा शेजारील प्रांगणात करण्यात आला होता. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वस्त विश्वास भोर, आनंद सराफ, प्रशिक्षक कुंडलिक कचाले आदी उपस्थित होते.