
दप्तराचे ओझे कमी करण्यास उपाय करा
पुणे, ता. २६ : ‘‘दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तकांची एकात्मिक स्वरूपात चार भागात विभागणी करावी. प्रत्येक पाठ, कविता यानंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट करावीत,’’ अशा सूचना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत सर्व विभागांचा आढावा केसरकर यांनी बैठकीत घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘‘प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वह्या शाळेत आणण्याची आवश्यकता असू नये. पाठ्यपुस्तकात दिलेल्या पानांचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे शिक्षकांकडून अवलोकन होणे आवश्यक आहे.’’
आधार नोंदणीबाबत सूचना
आधार नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, त्यासाठी काळजी घेण्याची सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षण विभाग आणि कृषी विभाग यांच्या समन्वयाने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक शाळेत परसबाग करण्यात यावी, असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी दिवसे यांनी राज्यातील स्काऊट, गाइड तसेच क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत माहिती दिली. यावेळी मांढरे यांनी शिक्षणातील योजना आणि अन्य विषयांचे सादरीकरण केले. बैठकीत राज्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अंतिम संच मान्यतेसाठी मुदतवाढ देण्यात यावी. आवश्यकता तपासूनच नवीन शाळांना मंजुरीचे प्रस्ताव सादर करावे. शिपाई पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी. अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत पात्र शिक्षकांचे समायोजन करावे. केंद्रप्रमुखांची पदेही तातडीने भरावीत.
- दीपक केसरकर, शिक्षणमंत्री