खोके, बोक्यांपुरतेच राजकारण मर्यादित का?

खोके, बोक्यांपुरतेच राजकारण मर्यादित का?

पुणे, ता. २७ ः सध्या राज्यातील राजकारणाची पातळी खूपच घसरली आहे. त्यामुळे रोज सकाळी कोणी कोणाला कुत्रा, कोणी मांजर तर, कोणी खोके, बोके म्हणत एकमेकांवर आरोप करत आहेत. राज्याचे राजकारण हे केवळ कुत्रा, मांजर, खोके, बोक्यापुरतेच आहे का? असा सवाल करत सर्वसामान्यांच्या विकासाबाबत कधी बोलणार आहात, असा प्रश्‍न संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी (ता. २७) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सत्ताधाऱ्यांना विचारला.

सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी हे परदेशात जाऊन उद्योगांबाबतचे सामंजस्य करार (एमओयू) करत आहेत. पण, या करारांपैकी किती उद्योग प्रत्यक्षात राज्यात आले. किती सुरू झाले, यावर भाष्य करत नाहीत. महाराष्ट्राचा विकास खुंटला असून, देशातील अन्य मागास राज्यांचा मात्र वेगाने विकास होत आहे. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर का जात आहेत, याचे आत्मचिंतन कधी करणार आहात, असा प्रश्‍न संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी उपस्थित केला.

स्वराज्य संघटनेच्या पहिल्या अधिवेशनासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला. ते पुढे म्हणाले, ‘‘सामान्य, शेतकरी, कष्टकरी यांना ताकद देण्याचे काम करायचे आहे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. हा जाब आता आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून विचारावा लागेल. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख आदींनी सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार देण्यासाठी कार्य केले. मात्र, सध्या बरोबर उलटे घडू लागले आहे.’’

‘समविचारी पक्षांशी युती करणार’
येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वराज्य संघटना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी आम्ही स्वतःहून कोणाकडे जाणार नाही, परंतु कोणी समविचारी पक्ष आमच्याकडे युती करण्यासाठी आले तर, आम्ही त्यांच्याशी युती करू. आमच्या दृष्टीने देशहित पाहणारा म्हणजे समविचारी पक्ष आहे. स्वराज्य आणि इतर पक्षांमध्ये असलेला फरक लोकांना लक्षात येईल, असे काम आम्ही करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. यापुढील काळात स्वराज्य हा सक्षम पर्याय म्हणून पुढे येणारच. एखादा नेता सुसंस्कृत असेल तर, तो आपल्यासोबत स्वराज्य संघटनेत स्वतःहून येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com