
जादा परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकांची १४ कोटींची फसवणूक
कृषी व्यावसायिकांना
१४ कोटी रुपयांना गंडा
हळदीच्या उत्पादनाची बतावणी
पुणे, ता. २८ : कृषी उद्योगात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात २४ व्यावसायिकांना गंडा घालण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अकोला येथील एका ६३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
या संदर्भात प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. ठाणे), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. बोरिवली पश्चिम, मुंबई), कमलेश महादेवराव ओझे (रा. कळवा, जि. ठाणे) आणि बाणेर येथील ए. एस. ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून काही व्यावसायिकांना कृषी उद्योगात गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे देण्याचे आमिष दाखवले. कृषी उत्पादनात कंपनी अव्वल असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हळदीचे उत्पादन घेणार आहोत अशी बतावणी करण्यात आली. त्यातून गुंतवणूकदारांकडून १३ कोटी ८२ लाख ८७ हजार रुपये उकळण्यात आले. परंतु त्यांना परतावा आणि मुद्दलही परत केले नाही. २०१९ पासून हा प्रकार सुरू होता. फिर्यादीने आरोपींकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम दिली. परंतु प्रकल्पाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.
--------