
उद्योगात नावीन्यपूर्ण बदल आवश्यक
पुणे, ता. २८ : उद्योग करा, व्यवसाय करा, काहीही करा, पण अंतिम सत्य पैसाच महत्त्वाचा असल्याचे मत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. ते संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भरविण्यात आलेल्या अधिवेशनात बोलत होते.
तांबे म्हणाले, सध्या देशात शंभर स्टार्टअप उद्योग आहे, पण त्याची उलाढाल कमी असून परदेशात याउलट परिस्थिती आहे. त्यासाठी उद्योगात सातत्याने नावीन्यपूर्ण बदल गरजेचे आहेत. उद्योगात हिशोब महत्त्वाचा आहे. तो काटेकोरपणे केला पाहिजे. पण थोडेफार पैसे आल्यानंतर तरुण राजकारणात उतरतो. राजकारण आणि व्यवसाय एकत्र करणे तारेवरची कसरत आहे. परंतु, काही उदाहरणे अशी आहेत, की ते दोन्हीमध्ये यशस्वी आहेत. अनेक तरुणांना उद्योग सुरू करायचा आहे, त्यासाठी आपली पत निर्माण करण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने किमान थोडेफार का होईना कर्ज घेतले पाहिजे. त्यातून बँकेत चांगली पत तयार होईल.
मिटकाँन फोरमचे संचालक गणेश खामगळ, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, अभिनेता निखिल चव्हाण या वेळी उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रात स्टार्टअप सुरू करणाऱ्या उद्योजकाचा सन्मान करण्यात आला. अभिनेता निखिल चव्हाण म्हणाले, ‘‘नवयुवकांना दिशा देणारे कोणीच नाही. पण, आता संभाजी ब्रिगेड उतरले असून तरुणांना खऱ्या अर्थाने दिशा मिळेल. संधी अनेक आहेत, फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे. म्हणून मी कला क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मोठ्या उद्योजकांनी नवीन लोकांचे स्वागत करून त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी दिशा ठेऊन काम केले पाहिजे.
उद्योग उभारण्यासाठी हा काळ महत्त्वाचा!
गणेश खामगळ म्हणाले, ‘‘स्टार्टअप नवा उद्योग नवा विचार घेऊन जात असताना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व काही बंद असेल तर सर्व काही एकसमान स्तरावर आहोत. त्यामुळे हा काळ उद्योग उभारण्यासाठी महत्त्वाचा आहे. कुठलीही सेवा देताना, घेताना आनंद वाटला तरच उद्योगामध्ये मोठे होऊ शकतो.