
माथाडी कायदा इंडस्ट्रीला लावू नये : वालचंद संचेती
मार्केट यार्ड, ता. २ : माथाडी कायदा इंडस्ट्रीला लावू नये, त्यांच्याकडे फक्त इंडस्ट्रीचाच कायदा असावा. तसेच संपूर्ण जिल्ह्यात हा कायदा लावू नये, जेथे जेथे हमालांचा जथ्था आहे त्या ठिकाणीच हा कायदा लावला जावा. हे दोन बदल केल्यास बराचसा फरक पडेल असे आम्हास वाटते. या गोष्टीला कामगार नेत्यांनी पुढे येऊन पाठिंबा देणे गरजेचे आहे. तसेच माथाडी कायद्यात दोन बदल प्रामुख्याने होण्याची गरज असल्याचे मत दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी केले आहे.
संचेती म्हणाले, कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी माथाडी कायद्याला कोणी नख लावल्यास लढा देऊ, असे मत व्यक्त केले आहे. शासनाने व व्यापाऱ्यांनी एका सदहेतूने माथाडी कामगार कायदा सुरू केला आहे. काही ठिकाणी या कायद्याचे पालन योग्य पद्धतीने होत आहे व तेथे कामकाज योग्य पद्धतीने चालू आहे, परंतु अनेक कारखानदार व व्यापाऱ्यांना काही अप प्रवृत्तीचे लोक त्रास देत आहेत, त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत आहेत. या त्रासाला अनेक कारखानदार, व्यापारी कंटाळले आहेत. या त्रासामुळे काही व्यवसाय महाराष्ट्राबाहेर गेले आहेत याची उदाहरणेदेखील आहेत. खंडणी उकळणे बंद होण्याची गरज आहे. या कायद्याचा गैरफायदा घेऊन व्यापारी व कारखानदार यांना त्रास देणे बंद होण्याची गरज आहे. शासनाचा माथाडी कामगार कायदा बंद करण्याचा विचार आहे असे दिसत आहे, असे संचेती म्हणाले.