विजेसाठी त्यांना करावे लागते दिव्य 

bhor
bhor

भोर (पुणे) : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरी (ता. भोर) येथे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले होते. रोहित्रही बिघडल्याने तीन दिवस वीजपुरवठा बंद होता. मात्र, तो पुन्हा सुरू झाला आहे. त्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविली. सुमारे 35 ग्रामस्थांनी 225 किलोचे रोहित्र दोन किलोमीटरपर्यंत लाकडाच्या शिकाळ्यावर खांद्यावरून वाहून नेले. त्यासाठी तीन दिवस लागले. 

वादळी पावसामुळे बुधवारी (ता. 18) मातीचे बांध खचून माझेरी येथील महावितरणचे सात खांब आणि 63/11 केव्हीए क्षमतेचे रोहित्र कोसळल्याने माझेरीतील 45 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. भोरपासून 45 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात पडलेले रोहित्र व खांब पुन्हा कसे उभारायचे व रोहित्र कसे नेऊन बसवायचे, याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चिंता पडली; परंतु माझेरीचे सरपंच विजय दिघे यांनी ग्रामस्थांसह महावितरणचे भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांना भेटून रोहित्र व पडलेले खांब उभारण्याची विनंती केली. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्यास तयारी दर्शवली. 

संतोष चव्हाण यांनी महावितरणचे बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्याशी चर्चा करून खांब व रोहित्र त्वरित उपलब्ध केले. गावातील ग्रामस्थांनी खांब व रोहित्र योग्य ठिकाणी वाहून नेले. रोहित्र वाहून नेण्यासाठी 35 ग्रामस्थांनी लाकडाचे शिकाळे करून दोन किलोमीटर अंतरावर नेऊन ठेवले. यासाठी तीन दिवसांचा कालावधी गेला. ग्रामस्थांसमवेत महावितरणचे शाखाधिकारी सचिन राऊत व ठेकेदार एम. जे. एस. इलेक्‍ट्रिकलचे मारुती कंक उपस्थित होते. 

ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही सात खांब आणि रोहित्र बसविण्याचे दिव्य तीन दिवसांत पूर्ण करू शकलो. 
-संतोष चव्हाण, उपकार्यकारी अभियंता, भोर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com