ट्यूशनचा आधार घेतात ५५ टक्के विद्यार्थी

ट्यूशनचा आधार घेतात ५५ टक्के विद्यार्थी

पुणे- भारतातील दहांपैकी पाचहून अधिक विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांना जातात, असे सर्वेक्षण केंब्रिज ग्लोबल एज्युकेशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेसारख्या देशात अवघे दहा टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांचा आधार घेतात. देशातील सुमारे ५५ टक्के विद्यार्थी ट्यूशनला अर्थात शिकवणी वर्गांत जात असल्यामुळे शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरजही अहवालात अधोरेखित केली आहे. 

 खासगी शिकवणी वर्गाकडे जाण्याचे प्रमाण का वाढत आहे, याबाबत शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख म्हणाले, ‘‘आपले शिक्षक पुरेसे कार्यक्षम आहेत किंवा नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. आपल्या शालेय विद्यार्थ्यांमधील ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना   शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे खासगी शिकवणीची गरज पडते. आपल्या देशात शिक्षकांचे प्रशिक्षण खूपच कमकुवत आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याच्या आणि समजून घेण्यास अधिक स्वारस्य निर्माण व्हावे, यासाठी शालेय स्तरावर योग्य संशोधन आणि नियोजन करण्याची गरज आहे.’’ 

शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या गीता महाशब्दे म्हणाल्या, ‘‘जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी समजत नाहीत, तेव्हा आपण त्या समजावून सांगतो. पण, असेही काही पालक आहेत जे समजावून सांगण्यास सक्षम नसतात. त्यांच्याकडे वेळ नसतो आणि कधीकधी त्यांनाच न कळल्यामुळे ते समजावून सांगू शकत नाहीत. अशा वेळी पाल्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी बाहेरून मदत घेणे चुकीचे कसे असेल?’’

 आजकाल शाळादेखील वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. कमी वेळात मुलांना संकल्पना लवकर समजतील, यासाठी प्रयत्न करत असतात. यामागे कारण काहीही असो, परंतु पालकांवर त्यांच्या पाल्यांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकप्रकारचा दबाव येतो. या परिस्थितीत पालक खासगी शिकवणी वर्गाकडे वळतात, असेही त्या म्हणाल्या.

शिकवणी वर्ग तेजीत 
 शाळांवरील कमी होत चाललेल्या पालकांच्या विश्वासामुळे शिकवणी वर्गाचा व्यवसाय कमालीचा तेजीत आहे. देशमुख म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वीचा विचार केल्यास त्या वेळी पालकांचा शाळांवर पूर्णपणे विश्वास होता. पण, प्रवेशसाठीची आणि टक्केवारीची स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे मुलांना ‘बेस्ट’ देण्यासाठी पालकांवर दडपण असते. म्हणूनच मूल बालवाडीत असते तेव्हापासूनच खासगी शिकवणी वर्ग लावले जातात. हे हास्यास्पद आहे.’’

नोकरीमुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तसेच मी मराठी माध्यमातून शिकले. पण मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असल्याने त्यांना खासगी शिकवणी लावावी लागली. शिकवणीमुळे सराव होतो. 
- पूनम पवार, पालक

 विज्ञान आणि गणित विषय अवघड जातात, त्यामुळे शाळेत न समजलेला मुद्दा शिकवणीला सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. इंग्रजी विषयातील पाठ आधी अर्थ सांगून समजावले जातात. शिकवणीत सर्व विषय अधिक सोप्या पद्धतीने शिकवले जातात.  
- सत्यम देसाई, सहावीतील विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com