स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वळताहेत ‘स्टार्टअप’कडे!

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वळताहेत ‘स्टार्टअप’कडे!

पुणे - ‘प्रशासकीय सेवेत जायचं आणि वेगळ्याप्रकारे समाजाची सेवा करायची,’ हे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत येतात. त्यातील काहींना हवं तसं यशही मिळतं, तर वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही काहींच्या पदरात निराशा पडते. मात्र या अपयशातून खचून न जाता, काही होतकरू तरुण आता ‘स्टार्टअप’कडे वळू लागले आहेत. 

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी परगावाहून आलेल्या तरुणांची संख्या जवळपास लाखाच्या आसपास आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील बहुतांश विद्यार्थी पुण्यात येतात. वारंवार प्रयत्न करून अपयश आलेले तरुण आता पुन्हा गावाकडे न परतता शहरातच नवे स्टार्टअप सुरू करत आहेत. बीड जिल्ह्यातून संकेत कदम हा देखील अशाचप्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी पुण्यात आला. बीएस्सी इन ॲग्रिकल्चर आणि एमबीए केलेल्या संकेतला प्रशासकीय सेवेची आवड असल्याने त्याने २०११ पासून या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पाच वर्षे अभ्यास करूनही यश दरवेळी चकवा देत होते. त्यानंतर संकेतने आपल्या ‘प्लॅन बी’ वर काम करण्यास सुरवात केली. शेअर मार्केटमधील व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी त्याने आवश्‍यक ते अभ्यासक्रम पूर्ण केले आणि स्वत:चा ‘स्टार्टअप’ सुरू केला. आता संकेत शेअर मार्केटमधील व्यापार आणि गुंतवणूक यासंदर्भात मार्गदर्शन करतो. शेअर मार्केटमध्ये नवख्या असणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही तो करतो. ‘‘प्रशासकीय सेवेची आवड होती, म्हणून राजपत्रित अधिकारीपदासाठी अभ्यास करत होतो. गेली पाच वर्षे यश हुलकावणी देत होते. मग स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून बाहेर पडायचे ठरविले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला,’’ असे संकेत समाधानाने सांगत होता.

इंदापूर तालुक्‍यातून विजय मते हा देखील स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी शहरात आला. तीन-चार वर्षे अभ्यास करून तो यशाच्या अगदी जवळ पोचला; परंतु यश हाती लागले नाही. म्हणून त्यानेही स्वत:चे काहीतरी सुरू करायचे, असा निश्‍चय केला. आजूबाजूच्या मित्रांची, अनुभवी लोकांशी चर्चा केली आणि त्याने माणिकबागजवळ स्वत:चा ‘केक अँड कॅफे’चा व्यवसाय सुरू केला. 

रवींद्र बारस्कर हा देखील लातूरहून पुण्यात आला. दोन-तीन वर्षे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले, परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. कर्ज काढून त्याने नवी पेठेत गाळा भाड्याने घेतला आणि खाणावळ सुरू केली. त्यानंतर स्वत: काही गाळे विकत घेऊन त्याने हॉटेलिंगच्या  व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. स्वप्नील वाघने देखील पीएसआयच्या परीक्षेची तीन-चार वर्षे तयारी केली, त्यानंतर स्वत:चा आकर्षक दरवाजे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. अपयशाने निराश न होता रवींद्र, विजय, संकेत 
यांसारखे असंख्य विद्यार्थी ‘स्टार्टअप’द्वारे आपली नवीन इनिंग सुरू करत आहेत.

व्यवसायाचा केला निश्‍चय
‘‘पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी तयारी करत होतो. परंतु यशाच्या अगदी जवळ पोचूनही ते हाती लागत नव्हते. त्यामुळे अनेकदा नैराश्‍य येत होते. मानसिक संतुलन बिघडत होते. पीएसआयच्या भरतीच्या जागा वाढविणार, असे आश्‍वासन दरवेळी सरकारमार्फत दिले जात होते. परंतु प्रत्यक्षात काहीच होत नव्हते. म्हणून स्वत:ची वेगळी वाट निवडायचे ठरविले,’’ असा अनुभव विजय मते याने सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com