पुणे - 'भारतीय समाजात असहिष्णुता वाढत असून, तरुणांना जातीय दंगलीत गुंतवून अस्मिता जागविण्याचे खोडकर काम सुरू आहे. विषमता वाढत असताना घटनेतील मूल्यांचा अंगीकार करून दहशतमुक्त समाजनिर्मितीकडे वाटचाल होण्याऐवजी घटनेतील मूल्ये संस्कारात आणि शिक्षणात उतरतच नाही,'' अशी खंत कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिरत्न रवींद्र माळवदकर यांना धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. प्रमोद आडकर होते. या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे सल्लागार डॉ. गौतम बेंगाळे, नगरसेवक अनिल टिंगरे, रमेश बागवे, चेतन तुपे, दादासाहेब सोनवणे, लता राजगुरू, सुवर्णा डंबाळे उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, 'घटनेची आखणी करताना स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता, समता आदी मूल्यांची रुजवात घातली होती. पक्ष, त्याचे नेतृत्व आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद खुंटत आहे.''
डॉ. सबनीस म्हणाले, 'राज्यघटनेने कोणत्याही धर्माचे कुंकू लावलेले नाही. तेव्हा धार्मिक समाज व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष नागरिकांचा नवा समाज निर्माण करण्याचे आव्हान आहे.''
माळवदकर म्हणाले, 'नाना पेठेत मिश्र जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. 16 मे 1973 रोजी झालेल्या दंगलीने मन विषण्ण झाले. त्यानंतर जाती-जातींमध्ये सलोखा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.''
विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
|