कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात घडलेल्या जोरदार राजकीय हालचालींमुळे निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांआधीच काँग्रेसला खिंडार पडले आहे. सदानंद शेट्टी आणि सुधीर जानज्योत या वजनदार नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघातील वातावरणाने मतदानाआधीच यु टर्न घेतला आहे.
काँग्रेसच्या दोन मोठे नेते आल्याने पक्ष आणि महायुतीची ताकद वाढली आहे. यामुळे मतांमध्ये वाढ होण्यास फायदा होईल. जानज्योत यांच्या नेतृत्वाखाली मेहतर समाजाला मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळेल अशी प्रतिक्रिया कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांच्या भाजप प्रवेशात पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
सुधीर जानज्योत हे मेहतर समाजातील असून, गेली 25 वर्षे राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा त्यांच्या समाजासोबतच दलित, मागासवर्गीय समाजात चांगला संपर्क आहे. महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक, महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. सदानंद शेट्टी हेदेखील कॅन्टोन्मेंटच्या परिसरातील वजनदार राजकीय नेते. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषवित त्यांनीही अडीच दशकांची कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्या पत्नीही विद्यमान नगरसेविका आहेत. शेट्टी हे त्यांच्या कामामुळे या परिसरातील झोपडपट्टी भागात सुपरिचित आहेत. सुमारे तीन हजार घरांचा सदानंदनगर हा एसआरएचा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविला आहे.
भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या या मतदारसंघात जानज्योत आणि शेट्टी यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. यामुळे विधानसभा निवडणूक सोपी झाली आहे. मताधिक्य वाढविण्यासाठी आणि पक्षसंघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीने ही एक सकारात्मक घटना आहे.
- गणेश बिडकर, सरचिटणीस, भाजप
गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाला जे जमले नाही ते भाजपच्या सरकारने करून दाखवले. तळागाळातील लोकांसाठी त्यांनी खूप चांगल्या योजना राबविल्या. आमच्या समाजाच्या अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली त्या सोडविण्यास चालना मिळू शकेल अशी आशा आहे.
- सुधीर जानज्योत, नेते भाजप
झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांसाठी अनेक वर्षे काम करत आहे. या अत्यंत गरीब लोकांसाठी मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने थेट लाभाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे या गरीबांना दिलासा मिळाला आहे. म्हणूनच पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
- सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.