#कारणराजकारण : गुंजवणीचे पाणी, विमानतळ गाजणार (व्हिडिओ)

वनपुरी - पुरंदर उपसा योजनेमुळे दुष्काळी भाग बागायती होत आहे. हे सरकारने येथे येऊन पाहावे, असे आवाहन गावकऱ्यांनी केले.
वनपुरी - पुरंदर उपसा योजनेमुळे दुष्काळी भाग बागायती होत आहे. हे सरकारने येथे येऊन पाहावे, असे आवाहन गावकऱ्यांनी केले.

वार्तापत्र - पुरंदर विधानसभा मतदारसंघ
दुष्काळी तालुका, अशी पुरंदरची ओळख. गेल्या आठ-दहा वर्षांत पुरंदर उपसा योजनेच्या पाण्यावर ‘जिरायती भाग’ असा शिक्का पुसत सासवड परिसरात शेतकऱ्यांनी फळबागा पिकविल्या आहेत. आता याच तालुक्‍यात विमानतळाचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित विमानतळ, पुरंदर उपसा योजनेतून बंद असलेला पाणीपुरवठा, नीरेतील ज्युबिलंट कंपनीतील गॅस वायुगळती, तसेच गुंजवणीचे पाणी, हे मुद्दे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गाजतील, असे चित्र आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांची समाधी, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, हे याच विधानसभा मतदारसंघातील. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जन्मभूमी म्हणजे पुरंदर. सरदार गोदाजी जगताप, बाळोजी कुंजीर, पिलाजी जाधवराव हे इतिहास घडविणारे मरहट्टे सरदार पुरंदरचेच. संत सोपानदेवांच्या संजीवन समाधीने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे पुरंदर. मराठ्यांचा, पेशवाईचा, संतसज्जनांचा वारसा मिळालेला हा पुरंदर विधानसभा मतदारसंघ आता आधुनिक काळातील नव्या समस्यांना सामोरे जात आहे. त्यापैकी सर्वांत कळीचा मुद्दा म्हणजे पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ.

पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्‍चित केली. पण, हाच मुद्दा नेमका या विधानसभेच्या निवडणुकीत कळीचा बनेल, असे चित्र आहे. छत्रपती संभाजीराजे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन हजार ८३२ हेक्‍टर जागा लागणार आहे. ती पारगाव, वनपुरी, उदाची वाडी, खानवडी, मुंजवडी, एखतपूर आणि कुंभारवळण या सात गावांतून संपादित करण्यात येणार आहे. पण, या गावांतील शेतकऱ्यांनी इंचभरही जमीन देण्यास प्रखर विरोध केला आहे. या सातपैकी पारगाव, उदाची वाडी आणि वनपुरी येथील ग्रामस्थांशी ‘सकाळ’ने ‘कारण राजकारण’ या मालिकेच्या माध्यमातून साधलेल्या संवादातून त्यांनी भूमिका मांडली. पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन गावकरी विमानतळाच्या विरोधात एकत्र आले आहेत. ‘विमानतळाला विरोध करणाऱ्या पक्षाला, उमेदवाराला आमचा पाठिंबा आणि 
विमानतळाला पाठिंबा देणाऱ्याला तीव्र विरोध’ अशी भूमिका येथील बहुतांश गावकऱ्यांनी घेतली आहे.

...त्यामुळे पाणी तोडलं
या दुष्काळी तालुक्‍यात पुरंदर उपसा योजना आली. आठ-दहा वर्षांपासून येथील शेतकरी पैसे भरून पाणी घेऊ लागले. जिरायती जमीन बागायत झाल्या. शेतात पाणी आले. फळबागा फुलल्या. शेततळी भरली. पडीक जमिनी वहिवाटीखाली आल्या. आता हा भाग दुष्काळी आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पुरंदर उपसा योजनेचे पाणी तोडले आहे. पण, या दबावाला न झुकता आम्ही आमच्या घामाने शेती पिकवू, असा दृढ निश्‍चय येथील शेतकरी बोलून दाखवितात.

प्लॅंट हटवा; नीरा वाचवा
नीरा गावातील ज्युबिलंट कंपनीत ॲसिडिक अनहायड्राइडचा प्रकल्प सुरू आहे. त्यातून एप्रिलमध्ये विषारी वायुगळतीच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर ५५ जणांना गंभीर स्वरूपाचा त्रास होता होता. त्यामुळे कंपनीतील प्लॅंट बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाईही लढली जात आहे. विधानसभेत नीरा परिसरातील मतदानावर हा मुद्दा प्रभावी ठरेल, असे दिसून येते.

मतदार  प्रतिक्रिया
पुरंदरमधील नियोजित विमानतळ हे गावकऱ्यांच्या विरोधात आहे. जो आमच्या पाठीशी उभे राहील, त्यालाच आम्ही मत देणार आहोत. मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत.
- संतोष मेमाणे, ग्रामस्थ, पारगाव

आम्ही २००९ पासून ज्युबिलंट कंपनीविरोधात आंदोलन करत आहोत. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून भांडवलदारांची बाजू घेतली आहे. सर्व राज्यकर्ते एकत्रित येऊन माणुसकीला काळिमा फासत आहेत.
- सचिन मोरे, ग्रामस्थ, नीरा

आमच्याकडे सध्या १०० ते १५० शेततळी तयार आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी शेततळ्यांत सोडून त्यावर फळबागा जगविल्या आहेत. आता विमानतळामुळे आमच्या फळबागा जाणार आहेत; पण आम्ही एक इंचही जागा देणार नाही.
- गणपत कुंभारकर, ग्रामस्थ, उदाचीवाडी

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com