एकात्मता धोक्‍यात येण्याचा बागुलबुवा संपुष्टात - विनय सहस्रबुद्धे

vinay-sahasrabuddhe
vinay-sahasrabuddhe

पुणे - मतपेटीच्या मोहापायी कलम ३७० कायम ठेवण्यात आले. ही तरतूद काढण्यात आली, तर देशाची एकात्मता धोक्‍यात येईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता तो बागुलबुवा संपुष्टात आला आहे, असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, वासुदेव कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘कलम ३७०+३५ अ’ या पुस्तकाचे सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्ताने निवारा सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लेफ्टनंट जनरल (नि.) डॉ. डी. बी. शेकटकर, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, वासुदेव कुलकर्णी, श्री गंधर्व वेद प्रकाशनचे दीपक आणि प्रकाश खाडिलकर या वेळी उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘काश्‍मिरी जनतेला वेगळेपणाची भावना टिकविण्यासाठी सांगून देशाच्या एकात्मतेपुढे आव्हान निर्माण करण्यात आले होते. ३७० कलम भावनिक फाळणीचा पाया घालणारे होते. या कलमामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम भीतीने विकास व सामाजिक न्यायाचा प्रवाह काश्‍मीरच्या जनतेपर्यंत पोचू दिला नाही. त्यामुळे तेथे शिक्षण आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. काश्‍मीरमध्ये तीन घराणे एकमेकांना जपत तेथील राजकारण करीत आहेत.’’

डॉ. शेकटकर म्हणाले, ‘‘राष्ट्रभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच हवे. त्याचप्रमाणे राष्ट्रशक्तीलाही राष्ट्रभक्तीचे अंतःकरण हवे. आतंकदवाद आपण मारू शकतो. पण, आतंकवादी मानसिकतेवर कसा बाँब टाकणार. या मानसिकतेचा संबंध कलम ३७० शी आहे.’’ 

धर्माधिकारी म्हणाले, ‘‘कलम ३७० हे देशाच्या एकात्मतेवर टांगती तलवार होती. पाकिस्तान कुरापती थांबविणार नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवे. चीन व पाकिस्तानची मैत्री देशाला धोकादायक आहे.’’ 
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com