पुणे - विरोधकांनी राफेलवरून राजकारण करू नये, असे आवाहन करीत कॉंग्रेस सरकारच्या काळातील संरक्षणाबाबतीत घडलेल्या गोष्टी उघड केल्या, तर विरोधकांना तोंड दाखवायलादेखील जागा राहणार नाही, असा आरोप परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. सिंह म्हणाले, 'देशाच्या सीमांवर पायाभूत सुविधा उभारणीबाबत आधीच्या सरकारकडून काम झाले नाही असे नाही; परंतु त्या वेळी कामांना आवश्यक ती गती नव्हती. काही प्रमाणात उदासीनता होती. मोदी सरकारच्या काळात पायाभूत सोयी- सुविधांसोबतच गरीब, शेतकरी, कमी उत्पन्न गटातील लोक अशा सर्व क्षेत्रांतील कामांमध्ये भरपूर गती आली. ''
ते म्हणाले, 'राफेलसारखी लढाऊ विमाने आपल्या संरक्षण खात्यात येणे गरजेचे होते. आघाडी सरकारच्या काळात 126 विमानांचा करार शेवटापर्यंत आला होता; परंतु निर्णय शेवटच्या क्षणी बदलला. त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आले. पहिल्यापेक्षा जास्त क्षमतेची नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी 36 विमाने घेण्याचे निश्चत झाले. नेमके कोणते तंत्रज्ञान लढाऊ विमानात हवे, यावर त्या विमानाची किंमत ठरत असते, मात्र केवळ अर्धवट माहितीवर विरोधक आरोप करत आहेत.''
1960 च्या दशकात भारताने स्वदेशी तंत्रज्ञानावर एचएफ-24 हे विमान बनवले मात्र, त्याचे इंजिन बनवता न आल्याने तो प्रकल्प ठप्प झाला. त्या वेळी अमेरिका, फ्रान्स यांनीही आपणास विमान इंजिन दिले नाही.
फ्रान्सचे एक तज्ज्ञ पथक भारतभेटीस येऊन त्यांनी संबंधित विमानाची माहिती व फोटो घेऊन पुढील काळात मिराज विमाने बनवली. यादरम्यान सदर विमानाची सर्व माहिती असलेल्या फाईल गायब झाल्या. याचे उत्तर मात्र कॉंग्रेस देत नाही. बोफोर्सच्यावेळी देखील अशाच प्रकारचा वाद झाला होता. देशाच्या सुरक्षेमध्ये असे राजकारण कोणत्याही पक्षाने करू नये, असे त्यांनी सांगितले.
|