Vidhan Sabha 2019 : घसरलेला टक्‍का कोणाच्या पथ्यावर?

Vidhan Sabha 2019 : घसरलेला टक्‍का कोणाच्या पथ्यावर?

विधानसभा 2019  
पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भरभरून भाजपच्या झोळीत मते टाकली. त्यामुळे शहरातील आठही जागांवर कमळ फुलले. यंदा मात्र मतदानाचा टक्का घसरला आहे. हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? भाजपला आठही जागा राखता येणार, की विरोधकांना त्याचा काही फायदा मिळणार, हे गुरुवारी (ता. २४) ठरणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहर व जिल्ह्यात मिळून ६९ लाख ३६ हजार मतदार होते. पाच वर्षांत मतदारांची ही संख्या ७७ लाख २९ हजारांवर गेली. तर, यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ८ लाख तीन हजारांनी, तर १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्याही एक लाख २० हजार एवढी वाढली. लोकसभा निवडणुकीत हा नवमतदार नरेंद्र मोदी यांच्या मागे ताकदीने उभा राहिला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी यांच्यात झालेल्या सरळ लढतीत विक्रमी मताधिक्‍याने बापट विजयी झाले. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक वेगळी राहिली. तर, आठही मतदारसंघांतील लढत ही वेगळी राहिली. काही ठिकाणी सर्व विरोधक एकत्र आले, तर काही मतदारसंघांत बंडखोरी, तर काही मतदारसंघांत मनसेने उमेदवार दिल्याने काय निकाल हाती येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

भाजपने दोन मतदारसंघांत विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली. त्यापैकी कोथरूड मतदारसंघात पक्षाचे दोन नंबरचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पाटील यांला अस्मान दाखविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सरळ लढत असलेल्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर, कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच गिरीश बापट रिंगणात नसल्याने आणि युतीत झालेली बंडखोरी, मनसेचे उमेदवार यामुळे चौरंगी लढत आहे. ही लढत काँग्रेस आघाडीच्या की भाजप-शिवसेना युतीच्या पथ्यावर पडणार, हे निकालावरून स्पष्ट होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात युती, आघाडी आणि मनसे, असे तिन्ही उमेदवार रिंगणात असल्याने रंगत आहे. या लढतीमध्ये भाजप ही जागा राखणार का, हा औसुक्‍याचा विषय आहे. 

मतदानाचा टक्का घसरण्यामागे आघाडीत फोडाफोडीचे भाजपने केलेले राजकारण हेदेखील एक कारण असल्याचे बोलले जात आहे. २०१४ आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये वाढलेले हे मतदान भाजपच्या पथ्यावर पडले होते. यंदा मात्र मतदानाचा घसरलेला टक्का भाजपला तारक ठरणार की मारक, हे येत्या २४ तारखेलाच कळणार आहे.

भाजपची खेळी मतदारांना नापसंत
खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट, पर्वती आणि वडगाव शेरी या पाचही मतदारसंघांत सरळ लढत झाली. निवडणुकीच्या दरम्यान आघाडीला खिंडार पाडण्याचे काम भाजपकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड झाले, असे चित्र असले; तरी भाजपच्या अनेक मतदारांना ही गोष्ट पसंतीस उतरलेली नाही. तसे अनेकांनी खासगीत ही बाब बोलून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com