शहरात उद्या पाणी"बाणी'? 

शहरात उद्या पाणी"बाणी'? 

पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात वीजनिर्मितीनंतर पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंद राहण्याची शक्‍यता आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या रावेत बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होऊन शहरातील मंगळवारचा (ता. 8) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी"बाणी' निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

शहराला महापालिका व एमआयडीसीतर्फे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उचलले जाते. या ठिकाणी वाघोली व हिंजवडी पाणीपुरवठा योजनेचेही जॅकवेल आहेत. तेही रावेत बंधाऱ्यातून पाणी उचलतात. महापालिका येथून जलवाहिन्यांद्वारे निगडी सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात अशुद्ध पाणी पाठविते. तेथून ते शहरातील टाक्‍यांमध्ये व निवासी वस्तीत वितरित केले जाते. तसेच एमआयडीसीकडूनही महापालिका पाणी घेते व त्या क्षेत्रालगतच्या निवासी भागात पाणीपुरवठा करते. दरम्यान, पवना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्रात वीजनिर्मिती करून पाणी नदीत सोडले जाते. तेथून ते रावेत बंधाऱ्यापर्यंत येते. मात्र, महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांनी सोमवारी लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यात पवना जलविद्युत केंद्रातील अधिकारी व कर्मचारीही सहभागी होणार असल्याने जलविद्युत केंद्राच्या वीजनिर्मितीवर परिणामी महापालिका व एमआयडीसी क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे महानिर्मितीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी महापालिका व एमआयडीसीला कळविले आहे. 

महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी संपाच्या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कल्पेश लहिवाल म्हणाले, ""महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचारी संपामुळे पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यात पाणी येण्याची शक्‍यता कमी आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्यास जलउपसा केंद्रातील पंप बंद ठेवावे लागतील. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसीतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. रावेत बंधाऱ्यातून आम्ही 110 दशलक्ष लिटर पाणी उचलतो.'' 

""पवना धरणातून नदीत सोडलेले पाणी रावेत बंधाऱ्यापर्यंत येण्यासाठी दहा तास लागतात. जलविद्युत केंद्रातून दररोज साधारणतः बाराशे ते साडेबाराशे क्‍युसेक पाणी नदीपात्रात येते. महानिर्मितीच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर धरणातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र पाठविले आहे. त्यांच्यामार्फत धरणातून चारशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जलसंपदा व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.'' 
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com