बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी चाळीस टक्कयाने कमी

baby-canal
baby-canal

उरुळी कांचन - बेबी कालवा "टोलवाटोलवीने फुटणार कालवा?" या आशयाचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द होताच, खडकवासला पाटंबंधारे व पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी चाळीस टक्कयाने तात्काळ कमी केली आहे. पाण्याची पातळी कमी करण्यात आली असली तरी, कालवा फुटु द्यावयचा नसेल तर कालवा फुटीसाठी धोकायदायक ठरणारे कालव्यातील जलपर्णी, इतर गवत व पाणी वाहतुकीला अडथळा ठरणारे घटक काढण्याची नितांत गरज आहे. मात्र पाटबंधारे खात्याचे धोरण पहाता कालव्याची दुरुस्ती व जलपर्णी काढण्यासंदर्भात कारवाई होणार का याबाबत साशंकताच आहे. 

दरम्यान बेबी कालवा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी केवळ पाण्याची पातळी कमी करणे ही बाब म्हणजे आग रामेश्‍वरी अन् बंब सोमेश्‍वरी! या म्हणी प्रमाने ठरणारी आहे. कालवा फुटीसाठी सर्वात मोठा धोका हा कालव्याच्या अस्तरीकरणाबरोबरच, कालव्यातील जलपर्णी व कांही पुल असतांना, अडथळे दुर करण्याएवजी कालव्यातुन वाहणाऱ्या पाण्याची पातळी कमी करणे ही बाब चुकीची आहे. पाटबंधारे खात्याने बेबी कालव्यातील जलपर्णी, इतर गवत व पाणी वाहण्यास अडथळा ठरणाऱ्या बाबी हटविणे गरजेचे आहे. याबाबत पाटबंधारे खात्याने हालचाली न केल्यास पुर्व हवेलीत आंदोलण उभारण्याचा इशारा लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत कुंजीरवाडीच्या सरपंच अनुराधा संतोष कुंजीर म्हणाल्या, हवेली व दौंड तालुक्यातील हजारो एकर शेतीसाठी पुणे महानगरपालीकेच्या वतीने शहरातील शुध्द केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलच्या मदतीने बेबी कालव्यात सोडले जाते ही बाब शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण ढिसाळ व पोकळ झाल्याने लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन व बोरी एैदी भागात मोठ्या प्रमानात गळती होत आहे. त्यातच कालव्यात मोठ्या पर्मानात जलपर्णी व एतर गवत कालव्यात उगवल्याने पाणी कालव्यातुन सलग वाहत नाही. याचा फटका कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना बसला आहे. तर कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीतील कांही लोकवस्तीत पाणी शिरल्याने घरे पडण्याची भिती निर्माण झाली आहे. कालव्यातील गवत व इतर अडथळे काढल्यास हा पाणी पाजरण्याचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी कालव्यातील अडथळे दुर करण्याकडे लक्ष देत नाहीत.

लोणी काळभोर (रायवाडी) येथील शेतकरी सुनिल बबन काळभोर म्हणाले, रायवाडी, कुंजीरवाडी (आंळदी म्हातोबाची ला जाणारा रस्ता), उरुळी कांचन हद्दीत पांढरस्थळा अशा अनेक ठिकाणी कालव्यावरुन जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. मात्र या रसत्याच्या खाली पाणी जाण्यासाठी छोट्या आकाराचे पाईप असल्याने पाणी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यातच कालव्यातील गवत व जलपर्णी अडथळाही मोठा असल्याने खऱ्या अर्थाने कालव्याची हीच शोकातिंका आहे. पाणी कमी करण्याएवजी पाटबंधारे विभागाने वरील कामे केल्यास पाण्याची पातळी वाढवले तरी कांही काळजी उरणार नाही. 

याबाबत खडकवासला पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पाडुरंग शेलार म्हणाले, कालवा फुटीसाठीच्या धोक्याला कालव्यातुन वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीपेक्षा पाणी वाहतुकीला अडथळे घटक कारणीभुत ठरतील हा शेतकऱ्यांचा आरोप मान्य आहे. यातुन तातडीने मार्ग काढण्यासाठी येत्या दोन दिवसात जेसीबीच्या मदतीने जलपर्णई व इतर गवत काढण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी यापुढील काळात तातडीने पावुले उचलण्यात येतील. शेतकऱ्यांनीही आपआपल्या हद्दीतील अडचणीची माहिती पाटबंघारे खात्याला द्यावी ही विनंती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com