शहरात यंदाही पाणीकपात

शहरात यंदाही पाणीकपात

पिंपरी - वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या वापरातही वाढ झाली आहे. ३१ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून पाणीकपात लागू करण्याचे संकेत पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. २०१५ मध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे ऑक्‍टोबर २०१५ मध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला पाच टक्‍के, त्यानंतर दहा टक्‍के आणि ३ मे २०१६ पासून २५ टक्‍के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी पवना धरणातून ३८० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात असे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली होती. यामुळे नागरिकांचे विशेषतः महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. २०१६ मध्ये चांगला पाऊस झाल्याने ऑगस्ट महिन्यात पवना धरण १०० टक्‍के भरले. सध्या पवना धरणात ५७.१३ इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

पवना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ४६५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा पाणीपुरवठा विभाग करीत आहे. दरमहा धरणातील पाण्यापैकी १२ टक्‍के पाणी वापरात येते. गेल्या चार वर्षांत शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी पाण्याच्या उपशामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. जर भविष्यात आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याबाबत उपाययोजना केली नाही, तर भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला शहराला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहराला सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा पाणीपुरवठा होत होता. मात्र अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण शहराला एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. आता गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज
पावसाचे पाणी गटार, नाल्याच्या माध्यमातून वाया जाते. जर सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीद्वारे पाण्याची साठवणूक केली, तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल आणि सोसायटीलाही हे पाणी अनेक महिने वापरता येईल.
 

सध्या पवना धरणात ५७.१३ टक्‍के पाणीसाठा आहे. योग्य नियोजन केल्यास शहराला १ ऑगस्टपर्यंत पुरेल.
- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण

धरणात ५७ टक्‍के पाणीसाठा असून, त्यातून एमआयडीसी, वाघोली प्रकल्प (तळेगाव), देहूरोड, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होतो. धरणाच्या पाण्यातून दरमहा १२ टक्‍के उपसा होतो. याचा विचार करून शहरात एप्रिलपासून पाणीकपात करण्याचा विचार आहे. निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेतली जाईल.
- रवींद्र दुधेकर, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com