पुणे : रब्बीसाठी उजवा मुठा कालव्यातून आजपासून आवर्तन

पुणे : रब्बीसाठी उजवा मुठा कालव्यातून आजपासून आवर्तन

पुणे : जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्‍यांतील रब्बी पिकांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी नवीन उजवा मुठा कालव्यातून रविवारपासून (ता.15) आवर्तन सोडण्यात येणार आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन उजवा मुठा कालव्यावर रब्बी आणि उन्हाळा हंगामातील पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. रब्बी पिकांसाठी दरवर्षी दोन आवर्तने दिली जातात. त्यापैकी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात आवर्तन दिले जाते. परंतु यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या कालव्यातून सुमारे तीन महिन्यांहून अधिक कालावधीपर्यंत पाण्याचे आवर्तन सुरू होते. त्यामुळे विहिरी आणि तलावामध्ये पुरेसे पाणी आहे.

गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी कालव्यातून पाणी थांबविण्यात आले होते. खडकवासला धरणातून 30 किलोमीटरपर्यंत कालव्याचे देखभाल दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते. काही ठिकाणी कालव्यावर भराव टाकून मजबुतीकरण करण्यात आले आहे. कालव्यातील गाळ आणि कचरा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात सोडण्यात येणारे आवर्तन रद्द करण्यात आले. परंतु इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत होती.

त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात रब्बी पिकांसाठी रविवारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दौंड, हवेली आणि बारामती तालुक्‍यांमधील काही भागात पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. नवीन उजवा मुठा कालव्यातून सुमारे एक हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com