handa 2.JPG
handa 2.JPG

कात्रज परिसरातील महिलांचा हक्काच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा 

पुणे :  ' पाणी द्या, पाणी द्या, आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या,' या घोषणा देत कात्रज येथील भारतनगर, दत्तनगर, निंबाळकर वस्ती, जाधवनगरसह गुजरवाडी रस्ता परिसरातील तब्बल दोनशे महिलांनी हंडा मोर्चा काढून कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन केले. नियमित एक वेळ किमान तासभर पुरेशा दाबाने पाणी द्या, या आशयाचे निवेदन पाणीपुरवठा अधिकारी सुनील आहिरे यांना दिले. 
कात्रजपासून गुजर निंबाळकरवाडी मार्गावरील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 38 मधील या भागाला गेली अनेक वर्षे पाणी समस्या भेडसावत आहे. यापूर्वी केलेल्या विनंतीनंतर काही काळ पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून दोन ते तीन दिवसांनंतर अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याचे ग्रहण लागले आहे. 
नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या तरी उपाययोजना होत नव्हती. कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम यांनी या हंडा मोर्चाचे आयोजन केले. भारतनगर, दत्तनगर या उंचावरील भागात तब्बल सहा हजार लोकवस्तीत काही जणांकडेच नळजोड आहेत.
बहुतांश कुटुंबांना सार्वजनिक नळावर पाणी भरावे लागते. रात्री अपरात्री कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे महिला वर्ग प्रचंड त्रस्त आहे. दोन हजार रुपये वर्गणी काढून वापरायचे पाणी टॅंकरने घेण्याची नामुष्की सर्वसामान्य कुटुंबांवर ओढवली आहे. 
आंदोलनात दीपक सरगर, सुरेश निगडे, अनिल बोटचाटे, बाबा साहिलाने, सलीम शेख, नागेश कडघर आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या वेळी बंद पडलेला बूस्टर पंप सुरू करा, हलगर्जीपणा करणाऱ्या चावीवाल्यांना काढून नवीन चावीवाले नेमा, दिवसा एकवेळ पुरेशा दाबाने पाणी द्या, अशी मागणी कदम यांनी केली आहे. 

रात्री सार्वजनिक नळावर भरावे लागते पाणी 
रात्री अपरात्री सार्वजनिक नळावर पाणी भरणे महिलांसाठी असुरक्षित आहे. दिवसा एकवेळ पुरेशा दाबाने पाणी द्या, पाणी सोडणारे चावीवाले प्रत्येकाकडून शंभर रुपयांची मागणी करतात, ते देणे सर्वांना शक्‍य होत नाही. पिण्याचे पाणी 
अनेकदा कात्रजमधून आणावे लागते, असा आरोप आंदोलनात सहभागी स्वाती शिंदे, सुरेखा रूद्राप, रत्नाबाई कचरे, रूपाली तामखेडे जयश्री म्हस्के, यासीन शेख यांनी केला आहे. 

'' हा शहराच्या टोकाचा भाग आहे आणि तोही उंचावरचा भाग आहे. टाकीतील पाणी कमी झाले की उंचावर पाणी चढत नाही. त्यासाठी आजपासून या उंचावरील भागाला सर्वप्रथम पाणी दिले जाईल. बेजबाबदार चावीवाल्यांऐवजी तत्पर काम करणाऱ्या चावीवाल्यांची नियुक्ती केली जाईल. महावितरणच्या यंत्रणेतील बिघाडामुळे बंद असलेला बूस्टर पंप तत्काळ दुरुस्त केला जाईल. पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष काढून सुरळीत पाणीपुरवठा दिला जाईल.''
- सुनील अहिरे, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com