पाण्यासाठी खडबडून जाग

वाघापूर (ता. पुरंदर) - शिंदवणे घाटावरील पंपगृहातील साठवण कुंडात पडणाऱ्या पुरंदर उपसाच्या पाण्याची पाहणी करताना विजय शिवतारे.
वाघापूर (ता. पुरंदर) - शिंदवणे घाटावरील पंपगृहातील साठवण कुंडात पडणाऱ्या पुरंदर उपसाच्या पाण्याची पाहणी करताना विजय शिवतारे.

पुणे - जिल्ह्यात बहुतेक तालुक्‍यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीही खडबडून जागे झाले आहेत. उपलब्ध पाणी व त्याचा वापर कसा करायचा, याबाबत बैठका सुरू झाल्या आहे. यातून विविध सूचना व मागण्या पुढे येत आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी त्याचबरोबर चारा यासाठी बरीच कसरत करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

पुरंदर उपसाचे पंप बंद ठेऊ नका - शिवतारे
माळशिरस - पावसाअभावी पुरंदर तालुक्‍यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा योजनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या योजनेचे काम पाहणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच यांत्रिकी विभाग व विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत एक दिवसही योजनेचे पंप बंद राहिले नाही पाहिजेत, अशा सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या. 

दुष्काळी परिस्थितीच्या पाशर्वभूमीवर शिवतारे यांनी पुरंदर उपसा योजनेच्या आढाव्यासाठी बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन योजनेचे पाणी सुरळीत चालण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी उपसभापती दत्ता काळे, राजेंद्र झेंडे, रामचंद्र खेडेकर, माउली यादव, अधीक्षक अभियंता चोपडे, कार्यकारी अभियंता सा. का. पाटील, यांत्रिक विभागाचे थोरात आदी उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले, ‘‘तालुक्‍यात या वर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने खरिपाबरोबरच शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही वाया गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पुरंदर उपसाच्या पाण्याचा उपयोग करून दुष्काळाशी दोन हात करत आपला प्रपंच टिकवण्याचा, जनावरे जगवण्याचा प्रयत्न करत आहे. याला सध्या पुरंदर उपसा हा एकमेव आधार आहे. त्यामुळे योजनेचे सर्व पंप व्यवस्थितीत कसे चालतील, यादृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. कुठल्याही कारणाने एकही दिवस पंप बंद राहता कामा नये.

योजनेबाबत अधिकाऱ्यांच्या काही अडचणी असतील; तर त्यांनी त्या अगोदरच सांगाव्यात. त्या वरिष्ठ स्तरावर सोडविण्यास मी बांधील आहे. मात्र, कुठल्याही कारणाने पाणी दुष्काळात बंद राहता कामा नये.’’

या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी शिवतारे यांच्या समोर मांडल्या. १९ टक्के पाणीपट्टीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पाणी घेण्यास परवडत असल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल शिवतारे यांचे आभार मानले.

योजनेचे कार्यकारी अभियंता सा. का. पाटील, अधीक्षक अभियंता चोपडे यांनी योजनेबाबतची व वाढत्या पाणी मागणीची माहिती या वेळी दिली.

शेतकऱ्यांनी सोडला सुस्कारा
दुष्काळी परिस्थितीत योजना उन्हाळ्यात चालते की नाही, याबाबत शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, विजय शिवतारे यांनी शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करू नये. योजना एक दिवसही बंद राहणार नाही, असे आश्‍वासन दिल्याने शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com